मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी भाविक आतुर झाले असून उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गणेशोत्सवाच्या या काळात नेहमी उभा असतो. पण अनेक मोठमोठ्या उत्सव मंडळांनी याची योग्य खबरदारी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही मोठ्या मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमा उतरविला आहे.
जीएसबी सेवा मंडळाने उतरवला तब्बल २६४ कोटींचा विमा
किंग्जसर्कलचे जीएसबी सेवा मंडळ यामध्ये अव्वल स्थानी असून यंदा २६४ कोटींचा विमा किंग्जसर्कलच्या जीएसबी सेवा मंडळाने उतरवला असून यामध्ये श्रींची मूर्ती, मंडप, दागिने आणि भक्तांसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा २२४ कोटी, भक्तांसाठी २० कोटी आणि बाप्पांच्या दागिन्यांचा २० कोटींचा विमा उतरविण्यात आल्याची माहिती ट्रस्टी आर.जी.भट यांनी दिली. मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे. जीएसबी मंडळातर्फे पाच दिवस धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाकडे ७० किलो सोने आणि ३५० किलो चांदीचा समावेश आहे. हे मंडळ आता सर्वात सुरक्षेची काळजी घेण्यातही अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान दुसरीकडे ‘नवसाला पावणारा’ म्हणून ओळखल्या जाणा-या ‘लालबागचा राजा’ला सर्वाधिक गर्दी होते. यंदा मंडळातर्फे भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे. मंडळातर्फे यावर्षी ५१ कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही विमा उतरविण्यामध्ये मागे नाही. या उत्सव मंडळातर्फे ७ कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (अंधेरीचा राजा) ५.५० कोटींचा विमा उतरवला आहे.