भारतीय इतिहासामध्ये दडलेली काही रहस्ये


कुठल्याही प्रांताचा इतिहास, तेथील संस्कृतीशी आपली ओळख करून देत असतो. पण याच इतिहासामध्ये काही घटना अश्या असतात की त्यांच्यामागील रहस्य नक्की आहे तरी काय ह्या प्रश्नांची उकल होणे कठीण होऊन बसते. आपल्या भारतीय इतिहासामध्ये देखील काही गूढे अशी आहेत, की इतकी शतके उलटून गेल्यानंतरही त्यांच्या मागील रहस्ये अजूननही उलगडलेली नाहीत.

इंडस व्हॅली संस्कृती : इंडस व्हॅली संस्कृती हे भारतीय इतिहासामधील प्राचीन रहस्य आहे. इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींच्या पेक्षा इंडस व्हॅली चा विस्तार मोठा. या संस्कृतीबाबत वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. ह्या संस्कृतीचे निर्माणकर्ते आणि त्यांची गूढ अशी ४००० वर्षे जुनी चित्रलिपी, अजूनही इतिहासकारांना पूर्णपणे समजले नाहीत. अजून एक अजब गोष्ट अशी की या संस्कृतीशी निगडीत सर्व ठिकाणांचा, जवळपास एकाच वेळी विनाश झाला, तो नेमका कसा हे ही रहस्य अजून उलगडलेले नाही.

छत्तीसगड मधील बस्तर प्रांताजवळील गुहांमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना काही भित्तीचित्रे सापडली आहेत. या चित्रांमध्ये मानवी आकाराचे, पण नाक – डोळे नसलेले जीव आणि उडत्या तबकड्या ( ufo ) दर्शविण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट अशी की आसपासच्या गावांमध्ये आकाशातून परग्रहावरील लोक येत असल्याच्या कथा चवीने सांगितल्या जातात. त्यामुळे ह्या भित्तीचित्रांचा आणि परग्रहावरील लोकांचा संबंध तो काय, या प्रश्नांचे उत्तर आजही सापडलेले नाही.

बिहार येथील राजगिर या शहराजवळ सोन भांडार नावाची गुहा आहे. मगधचा राजा बिम्बिसार याच्या खजिन्याकडे जाण्यासाठी या गुहेतून वाट तयार केली गेली असल्याचे सांगितले जाते. त्यामागची गोष्ट अशी, की राजा बिम्बिसाराला धन जमविण्याची फार हौस होती. आपल्या कारकिर्दीत त्याने मोठा खजिना जमविला होता. जेव्हा त्याचा मुलगा अजातशत्रू याने बिम्बिसाराला कैदेत टाकले तेव्हा आपला खजिना त्याच्या हाती लागू नये म्हणून बिम्बिसाराने या गुहेत लपविला. या खजिन्यापर्यंत कसे पोहोचायचे हे सांगणारी काही चित्रे त्या गुहेतच आहेत असे म्हटले जाते. ब्रिटिशांनी देखील खजिन्याच्या शोधाखातर या गुहे मध्ये तोफा डागून तिथल्या भिंती पडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

हैदराबादचे सातवे आणि अखेरचे, असफ जाह वंशाचे निजाम, मीर ओस्मान आली खान यांच्या संग्रही अनेक मौल्यवान हिरे होते. त्यांचा खजिनाही प्रचंड मोठा होता असे म्हणतात. १९३७ साली ‘ टाईम्स ‘ या मासिकाने, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मीर ओस्मान आली खान यांचा उल्लेख केला होता. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांची खासगी दौलत आणि आणि त्यांच्या संग्रही असलेल्या मौल्यवान रत्नांपैके अनेक रत्ने गायब झाली. त्यांचा शोध आजतागायत लागू शकलेला नाही. असे सांगितले जाते की मीर ओस्मान अलींची धनदौलत आणि अनेक मौल्यवान रत्नांचा खजिना हैदराबाद येथील किंग कोठी पॅलेस या निजामांच्या निवासस्थान असलेल्या वाड्याच्या तळघरामध्ये दडविलेला आहे.

राजस्थानातील जैसलमेर शहरापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असलेले कुलधरा हे गाव एके दिवशी, कैक वर्षांपूर्वी अचानक निर्मनुष्य होऊन गेले. या घटनेमागेही निरनिराळ्या आख्यायिका आहेत. पालीवाल ब्राह्मण रहात असलेले कुलधरा हे गाव एके काळी अतिशय संपन्न होते. पण त्या काळी सलीम शहा नावाच्या अतिशय क्रूर सरदाराची नजर गावाच्या सरपंचाच्या मुलीवर पडली आणि तिच्याशीच आपण लग्न करणार असा हट्ट त्याने धरला. जर ग्रामस्थांनी हे लग्न लाऊन दिले नाही तर मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करू अशी धमकीही सलीम शहा ने ग्रामस्थांना दिली. त्याच्या या धमकीने घाबरून जाऊन ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलाविली आणि त्या रात्री कुलधरामधील जवळजवळ ८० परिवारांमधील लोक गाव सोडून निघून गेले. पण जाण्यापूर्वी त्या गावामध्ये परत कोणीही सुखाने नांदू शकणार नाही असा शाप त्यांनी दिला. तेव्हापासून आजवर कुलधरा हे गाव अगदी निर्मनुष्य आहे. त्या गावातील सर्व लोक कुठे गेले आणि त्यांचे पुढे काय झाले हे रहस्य आज ही उकललेले नाही.

Leave a Comment