ट्रायच्या ‘या’ निर्णयामुळे होणार भारतीय ग्राहकांची पुन्हा एकदा दिवाळी


नवी दिल्ली: रिलायन्स जिओचे आगमन भारतीय टेलिकॉम क्षेत्रात होताच ग्राहकांची चांदी झाली. रिलायन्स जिओमुळे आजवर महागडे असणारे फोन कॉलचे दर भलतेच स्वस्त झाले. यापूढेही स्वस्त कॉल आणि फ्री डेटा हा सिलसिला कायम राहण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओला भारतात फोन कॉलचे रेट आणि इंटरनेटचे रेट स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे खरे श्रेय जाते. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पदार्पण केले आणि ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. बाजारपेठेतील स्पर्धा ही उत्पादनाचे दर नियंत्रित करते या नियमाने मग या क्षेत्रातील इतर मातब्बर कंपन्यांनाही फरफटत रिलायन्सच्या मागे यावे लागले. कधी नव्हे तो एअरटेल, आयडिया, व्होडाफोन आदी कंपन्यांनी आपल्या कॉलदरात आणि इंटरनेट डेटा दरात कपात केली.

दरम्यान, भारतीय मोबाईल ग्राहकांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा दिवाळी होणार आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ट्रायकडून आपल्या मोबाईल ऑपरेटर्ससोबत कनेक्टिंग कॉल्सच्या दरात आकारल्या जाणाऱ्या शुल्कात कपात केली जाणार आहे. या शुल्काला इंटरकनेक्ट यूजेस चार्ज (आईयूसी) म्हटले जाते. हे शुल्क म्हणजे कॉल टर्मिनेट करण्यासाठी ऑपरेटर दुसऱ्या ऑपरेटरकडून जी रक्कम आकारतो ते शुक्ल होय. सद्यास्थितीत आईयूसी शुल्क प्रतिमिनीट १४ पैसे या दराने आकारले जाते. ट्रायने सुचवलेल्या कपातीनंतर हे शुल्क १० पैसे प्रतिमिनिट एवढे असेल. गेल्या वर्षी पदार्पण केल्यापासून ग्राहकांना फ्री डेटा आणि कॉलींग सुविधा देण्याचा जो धमाका रिलायन्स जिओने लावला. त्यानंतर स्वस्त सेवा देण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. आता, ट्रायच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा ग्राहकांचा चांदी होणार हे नक्की.

Leave a Comment