भारत-चीन व्यापार जोमात


नवी दिल्ली – चीनमधून भारतात केली जाणारी आयात यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ३३ टक्क्यांनी वाढली असून सिक्किम सीमेवरील डोक्लाममध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. पण दोन्ही देशांमधील व्यापारात याच काळात मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये भारताने चीनकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी सामग्री आणि रसायनांची आयात केली आहे. या काळात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य ५.५ टक्क्यांनी तर चीनच्या युआनचे मूल्य ३.७ टक्क्यांनी वधारले असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

भारताने यंदाच्या वर्षाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत एकूण १८ अब्ज डॉलरचे (११ हजार कोटी रुपये) सामान चीनकडून आयात केले आहे. भारतीय व्यापारी रुपयाचे मूल्य वधारल्याने मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करत आहेत. सध्या देशांतर्गत बाजारपेठेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. रोजगार निर्मिती वाढावी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे एका वृत्तापत्रासोबत बोलताना स्टेट बँक ऑफ इंडियाचे आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी म्हटले आहे.

Leave a Comment