नवी दिल्ली – मोदी सरकारने बनावट कंपन्या स्थापित करून काळा पैसा जमा करणाऱ्यांविरोधात मोहिम छेडली असून काळ्या पैशांविरोधातील सरकारच्या या कारवाईमुळे अवघ्या एका महिन्यात अशा तब्बल १ लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. याबाबत कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांच्या इतिहासात ही शेल कंपन्यांविरुद्धची सर्वात मोठी कारवाई आहे. अशाच प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या इतर कंपन्यांवर सुद्धा सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मोदी सरकारने महिनाभरातच बंद केल्या १ लाख बनावट कंपन्या
काळा पैसा जमा करण्यासाठी आणि कर चुकवण्यासाठी ज्या कंपन्या स्थापित केल्या जातात अशा कंपन्यांना शेल कंपन्या संबोधले जाते. गेल्या काही महिन्यांपासून अशाच संशयित कंपन्यांना मोदी सरकार लक्ष्य करत आहे. सरकारची कठोर कारवाई पाहता अनेक कंपन्यांचे मालक स्वतः ह्या कंपन्या बंद करण्यासाठी धावपळ करत आहेत.
याबाबत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात १ लाख ३ हजार पेक्षा अधिक शेल कंपन्या बंद झाल्या असून हा एक विक्रम आहे. यापूर्वी एका महिन्यात सरासरी ३ ते ४ हजार शेल कंपन्या बंद होत असत. रजिस्टर ऑफिस ऑफ कंपनीजने सक्ती केल्याचा हा परिणाम आहे. मोदी सरकार संशयित कंपन्यांना लक्ष्य करत आहे. याच अंतर्गत सरकार आणखी काही कंपन्यांवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या विरुद्ध पुरावे सापडल्यास त्या सुद्धा बंद केल्या जातील.