पुणे – महाराष्ट्रातील आणखी ७१ गावांना आयसीआयसाआय बँक ‘डिजिटल गाव’ करणार असून, ग्रामीण भारताचा विकास घडवून बँकेने देशाची प्रगती करायचे उद्दिष्ट ठेवले आहे.
महाराष्ट्रातील ७१ गावे डिजिटल करणार आयसीआयसीआय बँक
या उपक्रमामध्ये सर्व व्यवहारांचे संपूर्ण डिजिटलायझेशन, इतर व्यावसायिक उपक्रम, गावक-यांना व्यावसायिक प्रशिक्षण पुरवणे, कर्जाचे वाटप करणे आणि गावक-यांना बाजारपेठ मिळवून देत त्यांच्या शाश्वत अर्थार्जनास मदत करणे आदी बाबींचा समावेश आहे. बँकेने या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १४ गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
समृद्ध राष्ट्र उभारणी ही केवळ गावांच्या सक्षमीकरणातून येऊ शकते, यावर आमचा विश्वास आहे. आम्ही महाराष्ट्रातील १४ गावे डिजिटल बनवली असून, हा आकडा डिसेंबर २०१७ पर्यंत ८५ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले.
राज्यातील १४ गावांमधून ५० हजार लोकांच्या आयुष्यात बँकेने बदल घडवून आणला. सात गावांमधील स्थानिक सहकारी सोसायटय़ांचे डिजिटायझेशन करून आणि मायक्रो एटीएमसह ३५ पॉइंट ऑफ सेल बसवून बँकेने हे साध्य केले आहे. त्यामुळे गावातील लोकांना आता बँकिंग व पेमेंट व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यांना आता आधारवर आधारित ई-केवायसी वापरून बँक खाती उघडता येतात, रिटेल दुकानांमध्ये पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मिशन वापरून कॅशलेस व्यवहार करता येतात.