अवघ्या अर्ध्या तासात एलआयसीने गमावले सात हजार कोटी


मुंबई – सिगारेटवरील उपकर (सेस) वाढवण्याचा निर्णय वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने घेतल्यामुळे भांडवली बाजारात मंगळवारी आयटीसी या तंबाखू उत्पादक कंपनीच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली. आयटीसीच्या समभागांची किंमत यावेळी १५ टक्क्यांनी घसरली. पण त्यामुळे आयटीसीच्या सर्वात जास्त समभागांची मालकी असलेल्या जीवन विमा निगमला (एलआयसी) मोठा फटका बसला आहे.

भांडवली बाजार आज उघडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात एलआयसीच्या ७००० कोटी रूपयांची राखरांगोळी झाली. एलआयसीकडे ३० जून २०१७ रोजी आयटीसीच्या १६.२९ टक्के समभागांची मालकी होती. एलआयसी गेल्या चार वर्षापासून आयटीसीमध्ये भागीदारी वाढवत आहे. एलआयसीचे आयटीसीमध्ये २०१३ मध्ये १२.१७ टक्के शेअर होते.

दरम्यान, भारतीय विमा कंपन्यांचे तब्बल १० हजार कोटींचे नुकसान आज भांडवली बाजारात झालेल्या घसरणीत झाले. एफपीआय कंपनीचे यामध्ये सर्वाधिक ९ हजार कोटींचे नुकसान झाले. याबद्दल बोलताना फ्रँकलिन टेम्पल्टन इन्व्हेसमेंटच्या सुकुमार राजा यांनी सांगितले की, आम्ही गुंतवणूकदार म्हणून दर्जा, शाश्वतपणा आणि विकासाच्या कसोट्यांवर समभागांचे मूल्यमापन करतो. मात्र, तंबाखू उत्पादक कंपन्यांचे समभाग नेहमीच अस्थिर असतात. त्यामुळे गुंतवणूकदार या समभागांमध्ये तितकीशी गुंतवणूक करत नाहीत, असे राजा यांनी सांगितले.

Leave a Comment