लव कुशाने स्थापन केलेले कुसुंभी माता मंदिर


लखनौ जवळ उन्नाव पाशी नबाबगंज भागात असलेले माता कुसुंभी मंदिर रामायण काळाशी नाते सांगणारे आहे. हे पौराणिक मंदिरर अतिशय रमणीय स्थळी वसलेले असून वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते. मातेचे हे सिद्धपीठ मानले जाते व येथे येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असाही विश्वास आहे. येथील पवित्र सरोवरात स्नान करून तेथेच प्रसाद शिजवून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे. नवरात्रीत येथे मोठी जत्रा भरते.

मंदिराची कथा अशी सांगितली जाते की रामाने सीता त्याग केल्यावर तिला वनात सोडण्याचा हुकुम लक्ष्मणाला दिला. लक्ष्मण रथातून सीतेला घेऊन जात असताना तिला तहान लागली तेव्हा पाणी आणण्यासाठी लक्ष्मण एका विहीरीपाशी गेला. पाणी काढताना प्रथम मला बाहेर काढ मग पाणी भर असा आवाज लक्ष्मणाला ऐकू आला. लक्ष्मणाने येथून देवीची मूर्ती बाहेर काढली व वडाच्या झाडाखाली ठेवली. नंतर तो पाणी घेऊन आला व सीतेलाही त्याने सारी हकीकत सांगितली. नंतर कानपूर जवळ बिठूर येथे त्याने सीतेला वनात सोडून रामाने त्याग केल्याचे सांगितले. तेव्हा सीतेने ती गर्भवती असल्याचे लक्ष्मणाला सांगितले. नंतर वाल्मिकींनी सीतेला त्यांच्या आश्रमात नेऊन तिचे व जन्माला आलेल्या लवकुश या जुळ्या भावंडांचे संगोपन केले.

नैमिष्यारण्यात रामाचा अश्वमेध यज्ञाच्या घोडा आला तेव्हा लवकुशनी त्याला अडविले. सीतेला या ठिकाणी आल्यावर देवीच्या मूर्तीची आठवण झाली व तिने कुशाला या देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यास सांगितले. त्यावरून तिला देवी कुशहरी असे नांव पडले. ही मूर्ती ७ फूट उंचावर स्थापली गेल्याने तिला सहज स्पर्श करता येत नाही. या देवीला काळ्या बांगड्या वाहण्याची प्रथा आहे. यामुळे अपूर्ण इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे.त्याचबरोबर फुलांनी स्वतःचे नांव अथवा इच्छा लिहिण्यची प्रथाही येथे पाळली जाते. अशा प्रकारे व्यक्त केलेली इच्छा नक्की पूर्ण होते असेही सांगतात.
———

Leave a Comment