बिहारचे राजकारण


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता दिल्लीत मोठे शक्तीप्रदर्शन होणार हे आता उघड झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत हुकमी बहुमत नाही. त्यामुळे ते मिळवण्याकरिता भारतीय जनता पार्टीला शिवसेनेसारख्या आपल्या मित्र पक्षाच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतील असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते. परंतु तशी स्थिती राहिलेली नाही. उलट कॉंग्रेस प्रणित महागठबंधनच्या काही घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. परिणामी, भाजपाचे पारडे जड झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर कमालच केली. त्यांनी भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का आहे. नितीशकुमार यांचे हे धोरण एका मोठ्या अर्थाने महागठबंधनाचे मरण ठरणार आहे.

नितीशकुमार यांनी भूमिका बदलल्यामुळे महागठबंधनातील फाटाफूट तर स्पष्ट झालीच. पण नितीशकुमार हे या महागठबंधनाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. कारण भाजपेतर पक्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जवळपास जाऊ शकेल असा कोणी नेताच नाही. त्यातल्या त्यात नितीशकुमार सर्वांना मान्य होतील असे उमेदवार आहेत. एक तर ते नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक आहेत पण महागठबंधनाचा प्रभाव निर्माण करून मोदींना पराभूत करता येऊ शकते. हे नितीशकुमार यांनीच बिहारमध्ये सिध्द करून दिलेले आहे. म्हणजे एका अर्थाने नितीशकुमार हे महागठबंधनाचे उद्गाते आहेत, आधारस्तंभ आहेत आणि तेच नितीशकुमार कॉंग्रेसच्या विरोधी आघाडीत न राहता सरळ सरळ भाजपाशी हातमिळवणी करत आहेत.

नितीशकुमार यांच्या या भूमिकेमुळे बिहारमध्ये सत्तेवर असलेले महागठबंधन तुटणार का आणि तिथले सरकार बदलणार का असा प्रश्‍न काही लोक विचारत आहेत. पण तसेही होण्याची शक्यता दिसत नाही. नितीशकुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज्यातल्या दलित मतदारांमध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याच्या हेतूने घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जितन मांझी या दलित नेत्याला मुख्यमंत्री केले होते. पण थोड्याच काळात त्यांना हटवून नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यातला दलित समाज नितीशकुमार यांच्यावर नाराज होता. ती नाराजी कमी करण्यासाठी नितीशकुमार आज रामनाथ कोविंद यांच्यामागे उभे राहिले आहेत.

Leave a Comment