सीबीएसईच्या बारावीच्या निकालात कॅन्सरग्रस्त मुलाने मिळवले ९५ % गुण


नवी दिल्ली – काल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदाही मुलींनीच या परीक्षेत बाजी मारली असून, ९९.६ टक्के मिळवत नोएडा येथील रक्षा गोपाळ हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ९८ टक्के गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांमध्ये त्रिवेंद्रम येथील अजय राज हा विद्यार्थी प्रथम आला आहे. या मुलांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत असलेल्या एका विद्यार्थ्याने १२ वीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. तुषार ऋषी असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याला एकूण ९५ टक्के गुण मिळाले आहे.

२०१४ मध्ये दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत असलेल्या तुषारला कॅन्सर झाला. त्याला दहावीची परीक्षा अगदी तोंडावर असताना हाडांचा कॅन्सर झाल्याचे समोर आले. त्याचे आयुष्य या एका घटनेने पूर्णपणे बदलले. एकीकडे करिअरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे वर्ष तर दुसरीकडे कॅन्सरशी लढा त्याची अशी दुहेरी अवस्था होती. उपचारांसाराठी अनेकदा रुग्णालयात जावे लागायचे. एवढ्या कमी वयात आयुष्यात अशी घटना घडल्यावर कोणीही खचून गेले असते पण मात्र तुषारने आपल्या अभ्यासवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर तुषारने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने सगळेच आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणजे त्याने अशी की कोणत्याही शिकवणीला न जाता घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले.

Leave a Comment