उद्यापासून समुद्रकिनाऱ्यांवरील बोटिंग बंद


मुंबई – महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नौकानयन, जलक्रीडेची सुविधा श्रीवर्धन तालुक्‍यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर या किनाऱ्यांवर आहे. सध्या पॅराग्लायडिंग सेवा बंद असून २६ मे पासून मेरिटाईम बोर्डाच्या आदेशानुसार जलक्रीडा बंद करण्यात येणार आहे. मेरिटाईम बोर्डाकडून डिसेंबर ते २५ मे अशी परवानगी या बोटींच्या मालकांना देण्यात येते. २५ मे नंतर मॉन्सून दाखल होण्याच्या पूर्वी खोल समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात. किनाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारचे नौकानयन, जलक्रीडा पूर्णपणे बंद करण्यात येतात. काही बोटींचे मालक २५ मे नंतरही बेकायदा या सेवा सुरू ठेवून पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment