शुल्क आकारणीत कोणतेही बदल नाही – एसबीआय


नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये जर तुमचे खाते असेल आणि तुम्हाला एक जूनपासून एटीएममधील प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये शुल्क लागणार अशी चिंता वाटत असेल तर अगदी टेन्शन घेण्याचे काही कारण नाही. कारण एसबीआयकडून एटीएममधील व्यवहारांवर शुल्क आकारणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. एटीएममधील प्रत्येक व्यवहारावर १ जूनपासून २५ रुपये आकारण्यात येणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

एटीएममधून सामान्य बचत खातेधारकांनी पैसे काढल्यास त्यासाठी आधीसारखेच शुल्क आकारले जाईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. एक माहितीपत्रक काढून याबद्दल एसबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आधीसारखेच एटीएममधून सर्व बचत खातेधारक ८ व्यवहार मोफत करु शकतात. यातील ५ व्यवहार एसबीआयच्या एटीएममधून, तर ३ व्यवहार अन्य बँकांच्या एटीएममधून करता येतील. निमशहरी भागातील खातेधारक एटीएममधून १० व्यवहार मोफत करू शकतील. फक्त बँकेच्या मोठ्या ग्राहकांसाठी एटीएममधून ४ वेळा पैसे काढण्याची मर्यादा असेल आणि तशी कोणतीही मर्यादा सामान्य बचत खातेधारकांसाठी नसेल, असे एसबीआयने माहितीपत्रातून स्पष्ट केले आहे.

दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बँकेच्या मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढण्याची नवी सुविधा सुरु करण्यात येणार आहे. पण मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारामागे २५ रुपये शुल्क आकारण्यात येईल. खातेधारकाकडे असलेल्या एसबीआयच्या बडी अॅपमध्ये पैसे असतील, तर खातेधारक ते पैसे एटीएममधून काढू शकतो. यासोबतच खातेधारक आता मोबाईल वॉलेट किंवा मोबाईल वॉलेटमधील बिझनेस करस्पॉन्डंटच्या माध्यमातूनदेखील बँक खात्यात पैसे जमा करु शकतात. याआधी ही सेवा उपलब्ध नव्हती, अशी माहिती असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी दिली आहे.

Leave a Comment