मुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे तुमच्यापैकी अनेक जण शरीराला थंडावा मिळवण्यासाठी रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडतात. पण या सरबतामधील बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. मुंबईत रस्त्यावरील बर्फाचे ७४ टक्के नमुने दुषित आढळले आहेत.
गॅस्ट्रोच्या साथीने सध्या मुंबई शहर आणि उपनगरात थैमान घातले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. मुंबईत रस्त्यारस्त्यांवर अनेक पदार्थात टाकला जाणारा बर्फ आणि बर्फाचे पाणी यांचे ७४ टक्के नमुने दुषित आढळले आहेत. यामध्ये ज्यूस, बर्फाचे गोळे, पाणीपुरी यांचा समावेश आहे.
फेरीवाल्यांकडच्या पाण्याच्या नमुन्यात १० टक्के पाणी दुषित असल्याचेही समोर आल्यामुळे रस्त्यांवरुन बर्फ आणि बर्फाच्या पाण्याचे पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या गॅस्ट्रो म्हणजेच अतिसाराच्या आजाराने भर उन्हाळ्यात डोके वर काढले आहे. मुंबईत जानेवारी ते एप्रिल दरम्यान गॅस्ट्रोचे २ हजार २८० रुग्ण आढळले आहेत. एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले आहेत. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे.