वर्षभरात पतंजलीने केली १० हजार कोटींची कमाई


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेला योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांनी अक्षरश व्यापून टाकले असून पतंजलीला गेल्या वर्षी १० हजार ५६१ कोटींचा नफा झाल्याची माहिती खुद्द रामदेव बाबा यांनी दिली आहे.

देशभरात तब्बल ६ हजार पतंजलीचे वितरक असून त्याची संख्या १२ हजारापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट पतंजलीसमोर आहे. तसेच रामदेव बाबांनी हरिद्वारसोबतच जम्मूमध्येही नवा प्लान्ट उभारणार असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन वर्षात देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनवण्याचे लक्ष्य असल्याच रामदेव बाबा म्हणाले.

रामदेव बाबा यांनी यावेळी सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं. पाकिस्तानला चीन हा पैसा दहशतवादी कारवाई करण्यासाठी पुरवतो, असा दावा रामदेव बाबांनी केला. दरम्यान, मागील ५ वर्षात पतंजलीने १०० टक्के वाढीची नोंद केली आहे.

यावेळी रामदेव बाबांनी पतंजलीकडून एका लष्करी शाळेची स्थापनाही करणार असल्याची घोषणा केली. शिवाय पतंजलीच्या पाच उत्पादनांमध्येच गोमूत्राचा समावेश आहे. इतर उत्पादनांमध्ये नाही, असेही रामदेव बाबांनी सांगितले आहे.

Leave a Comment