रिलायन्स जिओला फ्री सेवेमुळे २२.५ कोटींचा फटका


मुंबई – मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला कोट्यवधी ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून दिल्यानंतर यामुळे किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या असून याबाबत जिओ कंपनीने माहिती दिली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये गेल्या ६ महिन्यात जिओला २२.५ कोटी रूपयांचा शूद्ध तोटा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे आकडे ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१६ या कालावधीतील आहेत. कंपनीने या दरम्यान ग्राहकांकडून एकही रूपया घेतलेला नाही. याउलट कोट्यवधी ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि इंटरनेटची सेवा कंपनीने पुरवली. ३१ मार्चला संपलेल्या ६ महिन्यांच्या कालावधीची आकडेवारी सोमवारी कंपनीने शेअर बाजाराला दिली. यामध्ये ६ महिन्यात जिओला २२.५ कोटी रूपयांचा तोटा झाल्याचे सांगितले गेले तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शूद्ध तोटा ७.४६ कोटी होता असे सांगण्यात आले आहे.

जिओ वेलकम ऑफर सप्टेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर ही सेवा ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. त्यानंतर ‘हॅपी न्यू ईअर ऑफर’ या नावाने नवी सेवा ग्राहकांच्या सेवेत आणली. ही योजना पहिल्या योजनेसारखीच होती फक्त अमर्यादित डाटाऐवजी दररोज १ जीबी मोफत डाटा ग्राहकांना मिळत होता. ही सेवा ३१ मार्चला संपल्यानंतर समर सरप्राइज ऑफर आणि आता धन धना धन ऑफर अशा सेवा जिओने आणल्या. यापैकी समर सरप्राइज ऑफरपासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून त्यांनी पैसे आकारण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment