रेल्वे टार्गेट


काल ओडिशाच्या डोईकल्लू रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आणि दोन स्फोट घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ एप्रिलला ओडिशाच्या दौर्‍यावर येणार असून तिथे भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मान्य नसणार्‍या नक्षलवाद्यांनी रेल्वे स्थानकावर हा हल्ला केला असून हल्ला करताना घोषणा दिल्या आहेत. हल्ला करणारे नक्षलवादी संख्येने ३० एवढे होते आणि जाताना त्यांनी रेल्वेची काही उपकरणे पळवून नेली आहेत. यावरून सध्या नक्षलवाद्यांच्या आंदोलनाची दिशा समजून येत आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांना तीव्र विरोध करण्याचे ठरवले आहे आणि हा विरोध करताना जी तोडफोड केली जाईल ती रेल्वेची केली जाईल असा आंदोलनाचा त्यांचा आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी कानपूर येथे असाच स्फोट घडवला होता आणि रेल्वेचा अपघात घडवून आणला होता. हा अपघात घडवणारे नक्षलवादी नसले तरी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून नक्षलवादी आणि पाकिस्तानी अतिरेकी मिळून या कारवाया करत आहेत असे दिसून येत आहे.

नरेेंंद्र मोदी हे नक्षलवाद्यांचे लक्ष असण्याचे कारण आहे. पंतप्रधानांनी आणि केंद्रीय गृहखात्याने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याचा विडा उचलला आहे. अतीशय कठोर पावले टाकीत केंद्राने नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे आणि केंद्रामुळे आपल्या कारवायांचा प्रतिबंध होत असल्यामुळे नक्षलवादी चिडले आहेत. गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांच्या कारवाया तर कमी झाल्या आहेतच. पण पोलिसांना शरण येणार्‍या नक्षलवाद्यांची संख्याही वाढली आहे. त्याशिवाय नक्षलवाद्यांच्या कारवायात मरणार्‍या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. नक्षलवाद्यांचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे असे कोणी म्हणणार नाही परंतु त्यांच्या वैचारिक आधाराला हादरा बसत आहे आणि दुसर्‍या बाजूने आहे सुरक्षा यंत्रणा त्यांना नियंत्रणात ठेवत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे नक्षलवाद्यांचे आज लक्ष्य व्हावेत हे साहजिक आहे. मात्र नरेंद्र मोदींचा हा विरोध प्रकट करण्यासाठी या माओवादी कार्यकर्त्यांनी रेल्वेला आपले लक्ष्य केले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या रेल्वे अपघातांच्या चौकशीची निष्कर्ष समोर ठेवून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू केंद्रीय गृहखात्याला अहवाल पाठवला असून या कालावधीत झालेल्या बहुतेक रेल्वे अपघातामागे नक्षलवाद्यांचा किंवा पाक समर्थित दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे.

रेल्वेचा अपघात हा एक तांत्रिक भाग असतो. अपघात अनावधानाने होतो. परंतु रेल्वेच्या रुळावर काही तरी ठेवून रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो तेव्हा तो अनावधानाने घडलेला प्रकार नसतो तर जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असतो. रेल्वेच्या मार्गावर अडीचशे किलो वजनाचे रेल्वे स्लिपर्स हे काही अनावधानाने किंवा तांत्रिक चुकीने येत नसतात. ते कोणीतरी आणून ठेवत असते. असे मार्गावर स्लिपर्स ठेवण्याचे प्रकार दोन-तीन ठिकाणी आढळले आहेत. एक प्रकार तर कालच उघड झाला. शिवाय गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई ते इंदूर या मार्गावर असेच एक स्लिपर आणून ठेवलेले आढळले. या कालावधीत झालेल्या काही रेल्वे अपघातांमध्ये रुळाच्या फिशप्लेटस् काढलेल्या आढळल्या. त्याही माणसाकडूनच जाणीवपूर्वक काढल्या जात असतात. एकंदरीत अलीकडच्या दोन-तीन वर्षातील रेल्वे अपघात हे काही तांत्रिक चुकीमुळे किंवा अनवधानाने झालेले नसून ते घातपाताचे प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात धोकादायय भाग असा की हे अपघात घडवण्यामागे पाक समर्थित दहशतवादी आणि नक्षलवादी यांची हात मिळवणी झाल्याचे दिसत आहे.

रेल्वे विभागाने गृहखात्याला पाठवलेल्या अहवालामध्ये या शक्यतेबाबत काही पुरावे सादर केलेले आहेत. गतवर्षी बिहारमध्ये मोती पासवान या गृहस्थाला रेल्वेच्या अपघातात हात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आणि त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने कानपूरच्या रेल्वे अपघातामध्ये हात असल्याचे मान्य केले. कानपूरचा अपघात फार भयानक होता. त्यात १४० लोक मरण पावले आणि घोरासानजवळ झालेल्या या अपघातात प्रेशर कूकरमध्ये लपवलेल्या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. मोती पासवान याने या घातापातसाठी पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची मदत झाल्याचे सांगितले. अशाच प्रकारे ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसला याच परिसरात झालेल्या अपघातामध्ये अटक करण्यात आलेले तिघेजण हे नक्षलवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात तर १०० लोक मरण पावले होते. या तीन अपघातांचे वैशिष्ट्य असे की ते अपघात ज्या परिसरात झाले आहेत त्या परिसरात नक्षलवादी चळवळींचे मोठे प्राबल्य आहे. ओडिशातसुध्दा नक्षलवादी शक्तीशाली आहेत आणि त्यांनी तिथेही आता याच डावपेचांचा वापर सुरू केलेला आहे. तीन वर्षांपूर्वी ओडिशातल्या नक्षलवाद्यांनीी याच पध्दतीने एक पूर्ण रेल्वेच्या रेल्वे बारा तासापेक्षाही अधिक काळ ओलीस ठेवली होती. ही घटना अजून ताजी आहे आणि आता पुन्हा एकदा हे नक्षलवादी रेल्वेच्या माध्यमातूनच आपली शक्ती प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment