
नवी दिल्ली – देशातील ४जी सेवा वापरणा-यांच्या संख्येत रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र देशातील ग्रामीण भागात अजूनही ही सेवा अपेक्षेप्रमाणे पोहोचली नाही. वर्षाभरात २८ हजार मोबाईल टॉवर बीएसएनएल ही सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी उभारणार आहे. या माध्यमातून ती आपली २जी सेवा ३जीमध्ये बदलणार आहे. याचप्रमाणे २०१७-१८मध्ये निवडक शहरांत ४जी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
बीएसएनएलदेखील देणार ४ जी सेवा
आठव्या चरणानुसार देशातील २जी सेवा आता आधुनिक बेस स्टेशनांमध्ये बदलण्यात येत आहे. ३जी आणि ४जी सेवा देण्याचा कंपनीचा विचार आहे. देशातील निवडक शहरांत २०१७-१८ मध्ये ४जी सेवा सुरू करण्यात येईल असा अंदाज आहे, असे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले. कंपनीच्या ताब्यात असणा-या ३जी स्पेक्ट्रमचा वापर ४जी सेवा देण्यासाठी करण्याचा विचार आहे. यासाठी युरोपियन कंपनी नोकिया आणि एरिक्सन, याचप्रमाणे झेडटीई ही स्पर्धेत आहेत. बोली लावणा-या कंपन्यांत नोकियाने सर्वात कमी लावली आहे. दुस-या स्थानी झेडटीई आहे. या कंपन्यांच्या बोलींचा विचार करण्यात येत आहे. एप्रिलपर्यंत निविदेला अंतिम रुप देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
