‘तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या शाश्वत विकासासाठी व्हावा’


कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातीलतज्ज्ञांचे मत; सर्व सरकारांचे धोरण शेतीला मारक असल्याची टीकाही
पुणे: जी एम (जनुकीय परिवर्तीत) तंत्रज्ञानामुळे पिकांची उत्पादकता वाढते की नाही हे तपासणे गरजेचे असून, तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी व्हावा असे मत ‘बी. टी. बियाणे, जी. एम. (जनुकीय संस्कारित) तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुध्द पर्यावरणाचे धोके व शाश्वत सेंद्रिय शेती’ या विषयावरील परिसंवादात कृषी आणि तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. आजवरच्या सर्वच सरकारांचे धोरण शेती व शेतकऱ्यांसाठी मारक ठरले असल्याची टीका वक्त्यांनी एकमुखाने केली.

‘वनराई’ आणि ‘फोरम ऑफ इंटेलेकच्युअल्स ’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बी. टी. बियाणे, जी. एम. (जनुकीय संस्कारित) तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुध्द पर्यावरणाचे धोके व शाश्वत सेंद्रिय शेती’ या वादग्रस्त विषयावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांनी जी एम तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू मांडली; तर जी एम तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांसंदर्भात ‘धरामित्र’ या पर्यावरण तंत्रज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. तारक काटे यांनी आपली बाजू मांडली.

भारतामध्ये ‘शेतीसाठी जनुकीय परिवर्तीत तंत्रज्ञान’ हा विषय कायमच वादग्रस्त राहिला आहे. कधी बी. टी. कापूस, तर कधी बी. टी. वांग्याच्या निमित्ताने देशभरात जनुकीय परिवर्तीत (जी एम) तंत्रज्ञानासंबंधीच्या निरनिराळ्या वाद-विवादांना उधाण आले. जनुकिय परिवर्तीत (जी एम) बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतामध्ये करण्यासंबंधीचा निर्णय शासनाने घ्यावा किंवा नाही, हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐरणीवर येत आहे. जनुकिय परिवर्तीत (जी एम) बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतामध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेऊ नये, यासाठी काही तज्ञ व्यक्ती, संस्था- संघटना तीव्र विरोध दर्शवित आहेत, तर काही तज्ञ व संस्था या निर्णयाचे आणि जी एम तंत्रज्ञानाचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये याविषयी एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकरी व सर्वसामान्यांमधील हा संभ्रम दूर व्हावा आणि या विषयाच्या परस्परविरोधी दोन्ही बाजूंवर सखोल विचारमंथन घडवून आणावे या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जीएम तंत्रज्ञानाचे समर्थन करताना अजित नरदे म्हणाले, जनुकिय परिवर्तीत (जी एम) तंत्रज्ञानामुळे पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला व पिकांची उत्पादकता वाढली आहे. संकरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या. वेगवेगळे वाण निर्माण केले. त्यामुळे उत्पादकता वाढली. दर एकरी धान्याचे उत्पादन वाढण्यासाठी कीटकनाशकाचा शोध लागला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ४० कोटी होती. त्याकाळात सेंद्रिय शेती होती. त्यातून १०० टक्के जनतेला धान्य मिळत नव्हते; त्यामुळे आपल्याला मिलोसारखा गहू आयात करण्याची वेळ आली. देशातील शेती सेंद्रिय शेतीवरच केली असती तर देशातील जनता उपाशी राहिली असती. बी टी कॉटनचे बियाणे येण्याअगोदर बोंडआळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या १३ फवारण्या कराव्या लागत असत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढायचा. मात्र, तरीही बोंडआळीचे नियंत्रण होत नव्हते. बी. टी. कॉटनमुळे केवळ ३ औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात तसेच बोंडआळीवर पूर्णपणे नियंत्रण आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकरी उत्पादकता वाढली आहे व खर्चातही कपात झाली आहे. या तंत्रज्ञानाला गांधीवाद्यांचा, डाव्यांचा विरोध असतानाही सरकारने परवानगी दिली. जनुकिय परिवर्तीत (जीएम) तंत्रज्ञानामुळे बोंडआळी मरते म्हणजे ते विषारी आहे, माणसांसाठी व जनावरांसाठी अपायकारक आहे असा प्रचार केला गेला. परंतु माणसांना व जनावरांना कुठलाही प्रादुर्भाव होत नाही हे सिध्द झाले आहे. देशातील ९७ टक्के शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानाबद्दलचा संभ्रम दूर होणे आवश्यक आहे असे नरदे यांनी नमूद केले. जनुकिय परिवर्तीत (जी एम) तंत्रज्ञानामुळे उत्पाकता वाढली आहे. खर्चात कपात झाली आहे हे सर्सामान्य शेतकरी सांगत असताना या तंत्रज्ञानामुळे उत्पाकता वाढ होते की नाही हा वादाचा विषयच होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

डॉ. तारक काटे यावेळी म्हणाले की; कुठल्याही तंत्रज्ञांनाचा स्वीकार करताना तात्कालिक व शाश्वत तसेच वैयक्तिक की सामायिक लाभ मिळणार याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा जीवसृष्टीवर, समाज, आरोग्य, अर्थकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच हवामानातील बदलांच्या अनुषंगाने पिकाच्या जाती, विविध वाणांची विविधता टिकून राहणे आवश्यक आहे. या सर्वांना नवीन तंत्रज्ञान पर्याय आहे का; याचा विचार होणे आवश्यक आहे.

जनुकिय परिवर्तीत (जी एम) तंत्रज्ञानामध्ये एका ठिकाणचे जनुकं काढून ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये अथवा प्राण्यामध्ये घातले जाते. परंतु नेमके ते एकच जनुकं येते की त्याबरोबर दुसरेही जनुके येतात याबाबत अद्याप खात्री नाही. बोंडआळी मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे केवळ एक गुणधर्म नियंत्रित होत नाही तर अनेक गुणधर्म नियंत्रित होऊ शकतात. त्याचे धोके अधिक आहेत. मात्र, त्याचा निर्णय ज्याचा त्याला घ्यायचा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे; असे मत डॉ. काटे यांनी नमूद केले.

जनुकिय परिवर्तीत (जी एम) तंत्रज्ञांनामुळे दूरगामी व व्यापक परिणामांची संभाव्यता अधिक आहे. याचे परिणाम हे अपरिवर्तनीय आहेत. या तंत्रज्ञानामुळे अनियंत्रित कीड, उपयुक्त कीटकांना व जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जनावरे, पशु, पक्षी यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. पिकांच्या रानटी जाती नष्ट होण्याची भीती असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी रानटी जातींची आवश्यकता आहे. बी टी कॉटनमुळे उत्पादकता वाढली हे सांगितले जाते; मात्र; शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या क्षेत्रावर बी टी कॉटनचे पीक घेतले. एकरी उत्पादनात वाढ झाली नाही; असा दावा डॉ. काटे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी खरच हे तंत्रज्ञान उपयोगी आहे का आणि उत्पादकता वाढली आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment