नवी दिल्ली – ३१ मार्च २०१७ पर्यंत ४जी इंटरनेट सेवा रिलायन्स ‘जिओ’च्या ग्राहकांना मोफत देण्याची घोषणा झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर रिलायन्स जिओचे सिमकार्ड घेण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळत होते. पण ही सेवा ३१ मार्चपर्यंतच असल्याने त्यानंतर काय? असे अनेक प्रश्न गेल्याकाही दिवसांपासून जिओ ग्राहकांना पडले होते. याच प्रश्नाचं उत्तर आता मिळाले आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे.
३१ मार्चनंतरही बोला फुकट
मार्च महिन्यानंतर ही रिलायन्स जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी मोफत कॉलिंग सेवा देणार आहे. यासाठी लवकरच नवे टेरिफ प्लॅन्स जाहीर करण्यात येणार आहे. ज्यामुळे जिओच्या ग्राहकांना वॉईस कॉलिंग पूर्वी प्रमाणेच मोफत असणार आहे. केवळ इंटरनेटसाठी ग्राहकांना १०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क तीन महिन्यांसाठी वैध असणार आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मोबाईल सेवा लाँच केली होती. त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यत मोफत कॉलिंग आणि डेटा सर्व्हिस देण्याचे घोषित केले होते. यानंतर कंपनीने मोफत कॉलिंग आणि डेटाची मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवली होती. आता कंपनी पून्हा एकदा आपल्या ग्राहकांना मार्चनंतरही मोफत सेवा देण्याचा प्लॅन करत आहे.