पतंजलीत होणार ८००० पदांसाठी नोकर भरती


हरिद्वार – योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीने नोकर भरतीची जाहिरात काढली असून पतंजलीने तब्बल आठ हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरील नोकऱ्या उपलब्ध आहेत. पतंजलीच्या उत्पादनांची भारतात गेल्या काही वर्षांपासून चांगली विक्री होत आहे. भारतीय बाजारपेठेत पतंजलीच्या उत्पादनांना चांगली मागणी उत्पन्न झाली असून रामदेव बाबांनी येत्या काही वर्षांमध्ये १०,००० कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

यासाठीच, रोजगाराची संधी या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. एकूण ८,०९७ पदांची भरती होणार आहे. सेल्स ऑफिसर, इंजिनिअर, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होईल आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत होणार आहे. १०, १२ आणि पदवी अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी देखील अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. येत्या काही वर्षांमध्ये आपले १०,००० कोटी उलाढालीचे लक्ष आहे असे रामदेव बाबांनी म्हटले होते. त्या दृष्टीने कंपनी विस्तारण्याचे काम सुरू आहे.

आपला अर्ज [email protected] या इमेल अॅड्रेसवर किंवा पतंजलीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. टुथपेस्ट, मॅगी, शॅम्पू, हेअर कंडिशनर इत्यादी अनेक उत्पादनांनी बाजारपेठमध्ये चांगले स्थान कमवले आहे. पतंजली नूडल्स, बिस्कीट आदी उत्पादनांना देखील चांगली मागणी आहे. भविष्यकाळात जीन्स बाजारात आणण्याची देखील पतंजलीची योजना आहे. नागपूर शहरात तर पतंजलीचा भव्य मॉल उभा होणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment