३१ मार्च आधीच बंद होऊ शकते जिओची मोफत सेवा !


नवी दिल्ली: देशातील टेलिकॉम क्षेत्र रिलायंस जिओच्या धमाक्याने हादरले असून अनेक कंपन्यांना जिओच्या मोफत सेवेमुळे फटका बसत असल्यामुळे या कंपन्यांनी एकत्र येऊन ‘ट्राय’ म्हणजे दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे आता जिओ विरोधात जर काही कारवाई झाली तर जिओच्या ग्राहकांना मोफत सेवेला मुकावे लागणार आहे.

आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा जिओच्या मोफत ऑफरमुळे सामना करावा लागत असल्याची दूरसंचार कंपन्यांची तक्रार आहे. त्यातच कॉल ड्रॉपच्या समस्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी ही मोफत सेवा ३१ डिसेंबरपर्यंतच होती. मात्र त्यात तीन महिन्यांनी वाढ झाल्यामुळे एअरटेलने आता रिलायन्स जिओची ऑफर वाढवण्यासाठी परवानगी देण्याच्या ‘ट्राय’च्या निर्णयाविरोधात दूरसंचार विवाद प्राधिकरण टीडीसॅटकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता दूरसंचार प्राधिकरण काय निकाल देणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

‘ट्राय’ने रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग ऑफर ३१ डिसेंबरनंतर बंद करावी, असे एअरटेलने म्हटलं आहे. मार्च २०१६ पासून ‘ट्राय’च्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे एअरटेलचे नुकसान होत आहे. शिवाय मोफत व्हॉईस कॉलिंगमुळे एअरटेल नेटवर्कलाही अडथळा येत असल्याचा आरोप एअरटेलने केला आहे. दरम्यान ‘ट्राय’ने एअरटेलच्या या याचिकेवर उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे टीडीसॅटने पुढच्या सुनावणीवेळी उत्तर देण्याचे ‘ट्राय’ला आदेश दिले आहेत. याची पुढील सुनावणी ६ जानेवारी २०१७ ला होणार आहे.

Leave a Comment