गुजरात – नोटाबंदीच्या निर्णयाच्या पाठीशी देशातील जनता ठामपणे उभी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत वारंवार करण्यात येत आहे. पण गुजरातमधील हिरे व्यापारी आणि कारागिरांकडून या दाव्याला छेद देणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर हिऱ्यांच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला असून येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. हिऱ्यांची बाजारपेठ दिवाळीनंतर अक्षरश: चौपट झाली आहे. येथील एकही कारखाना गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेला नाही, असे हिऱ्यांच्या कारागिरीचे काम करणाऱ्या नागाजी यांनी सांगितले.
नोटाबंदीचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर देशातील अनेक लहान-मोठ्या उद्योगांपुढे संकट उभे राहिले होते. त्याचाच प्रत्यय सूरतमधील हिरे व्यावसायिकांनाही येत आहे. सूरतमधील वराछा परिसरातील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आणि कारखाने नोटबंदीनंतर अडचणीत सापडले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत केलेल्या भाषणात यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार जाण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखविली होती. या सगळ्याचा विपरीत परिणाम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर (जीडीपी) होणार असल्याचा इशाराही मनमोहन सिंग यांनी दिला होता.