देशातील खादी ग्रामोद्योग मंडळाने २०१८ पर्यंत त्यांच्या उत्पादनांची विक्री पाच हजार कोटींपेक्षा अधिक करण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यासाठी मंडळ ई कॉमर्स कंपन्यांना आपलेसे करण्याच्या विचारात असून तशी योजना तयार केली गेली आहे. मंडळाच्या सीईओ उषा सुरेश म्हणाल्या या संदर्भात आम्ही अनेक ई कॉमर्स कंपन्यांशी चर्चा करत आहोत. पेटीएम बरोबर आमचा करार लवकरच होत आहे.
देशात कॅशलेस, होम डिलिव्हरी व वेळेची बचत असे सर्व फायदे देण्यामुळे ई कॉमर्स खरेदीला ग्राहक खूपच पसंती देत आहेत. ऑनलाईन खरेदी वाढतच चालली असल्याने खादी ग्रामोद्योग मंडळानेही या सुविधेचा फायदा त्यांच्या उत्पादनांसाठी करून घेण्याचा विचार केला आहे. त्यांच्या एकूण उत्पादनांतील किमान १० टक्के विक्री ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर देशभरातील शहरांतून खादी इंडिया लाऊंज सुरू करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. खादी प्रिमियम ब्रँडच्या रूपात सादर करण्यासाठीच्या योजनाही बनत आहेत. दिल्ली, मुंबई व जयपूर येथे या प्रयत्नांचाच भाग म्हणून खादी इंडिया लाऊंज लवकरच सुरू केली जात आहेत.