मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नोटाबंदीनंतर काल जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सर्व सामान्यांना रेपो रेटमध्ये घट न करता झटका दिला. त्याचवेळी बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटविण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, ११.५५ लाख कोटी रुपयांच्या जुन्या – रद्द झालेल्या नोटा बँकांकडे परत आल्याची महत्त्वाची माहिती ऊर्जित पटेल यांनी दिली. ४ लाख कोटींच्या नव्या नोटा छापून जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे काम वेगात सुरू असून १००० रुपयाची नवी नोटही चलनात येऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे चलनात नव्या नोटा लवकरच येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात घट होईल, असे पतधोरण निश्चिती समितीचे मत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत झालेली राष्ट्राध्यक्षांची निवड, कच्च्या तेलाच्या किमती आणि अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा धोका लक्षात घेऊन व्याजाचे दर ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.