
भारताची वाटचाल कॅशलेस व डिजिटल च्या दिशेने सुरू असतानाच सायबर सुरक्षेबाबत अनेक आव्हाने निर्माण झाली असल्याचे सायबर तज्ञांचे मत आहे. गेल्या १ वर्षात ७२ टक्के कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा दणका बसला असून त्या वित्तीय क्षेत्र, विमा क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गतवर्षात ७२ टक्के कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा दणका
रिसर्च फर्म गार्टनरच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात सायबर क्राईम मध्ये तिप्पट वाढ झाली असून या काळात ३२ हजारांहून अधिक सायबर गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यात २० हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक झाली आहे. गेल्या तीन वर्षात ९६ हजारांहून अधिक वेबसाईट हॅक झाल्या आहेत. गेल्या वर्षातच ७२ टक्के कंपन्यांना सायबर हल्ल्याचा दणका बसला असून त्यातील ६३ टक्के कंपन्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
येत्या चार वर्षात म्हणजे २०२० पर्यंत ऑनलाईन व्यवसायात असलेल्या ६० टक्के कंपन्यांना सायबर हल्याचा धोका असून त्यामुळे आयटी सिक्युरिटी फर्मंवरचा दबाव वाढेल असाही अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. आजघडीला दररोज सरासरी ८० वेबसाईट हॅक केल्या जात असून सायबर हल्ल्यांचा धोका अधिक असलेल्या जगभरातील ४४ देशांत भारताचाही समावेश आहे. हल्लेखोर अर्थसंस्था व विमा सेक्टरला निशाणा बनवत आहेत. या हल्ल्यात सर्वाधिक ७२ ट्के कंपन्या याच सेक्टरमधल्या आहेत. आयटी टेलिकॉम मधील २३ टक्के, फार्मा केमिकलमधील ४४ टक्के तर १९ टक्के सरकारी कंपन्या सायबर हल्यांना बळी पडल्या आहेत.
