
नवी दिल्ली – ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर ५०० च्या नोटा बाजारात आणल्या जात आहेत. मात्र, या नोटांत अनेक चुका आढळून आल्याने गोंधळ उडाला आहे.
५०० च्या नव्या नोटांमध्ये ढीगभर चुका
५०० चा आकडा महात्मा गांधीच्या मागे छापण्यात आला आहे. मात्र, त्यातील शेवटचा शुन्य दिसत नसल्याने ती नोट ५० ची असल्याचा भास होतो. शिवाय, गांधीच्या प्रतिमेची छाया दिसत आहे. तर अशोक स्तंभाची जागा बदलण्यात आली असून, आकारही कमी करण्यात आला आहे. रिझर्व्ह शब्दातील आर आणि ई एकत्र जोडून आले आहेत. तर अनेक अक्षरे अगदी बारीक छापण्यात आली आहेत. अनुक्रमांकात बदल करण्यात आला आहे. सिक्युरिटी थ्रेडच्या जागेत बदल दिसत आहे. या चुका लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्या माघारी घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. आतापर्यंत किती चुकीच्या नोटा छापल्या आहेत, याची आकडेवारी समोर आली नाही.
या चुकीच्या नोटा बाजारात आल्यामुळे या नोटा बनावट आहेत का खऱ्या याविषयी लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. नोटांचा रंग फिकट दिसत असला तरी या नोटा खऱ्या आहेत, अशी माहिती आरबीआय प्रवक्त्या अल्पना किल्लावाला यांनी दिली.
