मुंबई : बँकांसमोरील रांगा आता काही प्रमाणात कमी झाल्या असल्यातरी कुणी चिल्लर देता का चिल्लर, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण सध्या सुट्ट्या पैशांचा मोठा तुटवडा बाजारात दिसत आहेत.
८ नोव्हेंबरपासून जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा केंद्र सरकारने बंद केल्यानंतर सरकारने दोन हजाराची नोट चलनात आणली. सध्या अनेक एटीएममधून दोन हजारची नोट निघत आहे. मात्र या नोटांचे सुट्टे पैसे कसे करायचे, हा मोठा प्रश्न आहे. या अडचणीमुळे जवळ पैसे असूनही नागरिकांना खर्च करता येत नाहीत. नव्या पाचशेच्या नोटा जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मात्र बहुतांश एटीएममध्ये सध्या फक्त दोन हजारच्याच नोटा उपलब्ध आहेत. जुन्या हजार, पाचशेच्या नोट बंद झाल्यानंतर शंभरच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. ही परिस्थिती आता निवळली असली तरीही बाजारात सुट्ट्या पैशांवरुन ग्राहकांची मोठी अडचण होताना दिसत आहे.