
सापनागांचे खेळ करून उपजिविका करणार्या गारूडी या भटक्या समाजाच्या विकासासाठी व त्यांना एका जागी स्थिर करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने खास गारूंड्यासाठी गांव वसविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले गेले आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांच्या कनौज मतदारसंघात हे गांव वसविले जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी या गावात पर्यटकांसाठीही विशेष सोयी केल्या जाणार असल्याचे सांगितले. या गावात गारूडी त्यांचे पारंपारिक कलाप्रकार सादर करू शकतील व अन्य उद्योगधंदाही करू शकतील.
उत्तर प्रदेशात वसणार गारूड्यांचे गांव
साप नागांचे खेळ करण्याची भारतात फार प्राचीन परंपरा आहे. हिंदू समाजात नाग सर्पाची पूजाही केली जाते. भारतात गारूडी समाज विस्कळीत अवस्थेत आहे. त्यातही उत्तरप्रदेशात सहारपुआ व बैंगा अशा त्यांच्या दोन जमाती आहेत. बरेली जिल्ह्यात या जमाती आहेत मात्र हे लोक भटके आहेत. ते गावोगावी फिरून साप नागाचे खेळ करतात, गावोगावी जाऊन साप पकडण्याची कामे करतात तसेच साप चावल्यास विष उतरविण्यासाठीही त्यांना बोलावले जाते. अतिशय विषारी समजल्या जाणार्या कोब्रा नागांना पकडण्यात हे लोक माहिर मानले जातात. या विषारी नागांना ते लिलया खेळवतात. यातील बहुसंख्य लोक हिंदू असून ते शक्तीपंथीय कालीची उपासना करणारे आहेत. कांही मुस्लीमही आहेत. या भटक्या समाजाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या उद्देशानेच त्यांच्यासाठी स्वतंत्र गांव वसविले जात आहे.
