कांही समाजविघातक शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकर्यांवर कोणताही कर लावणार नाही असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. रविवारी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अंातरराष्ट्रीय साखर संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे कौतुक करताना त्यांनी शेतकर्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्याचेही सांगितले.
मोदी म्हणाले, शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना सरकारने आखल्या आहेत. ऊस उत्पादन क्षेत्राप्रमाणेच जागतिक पातळीवर स्पर्धा असलेल्या बांबू उत्पादनाबाबतही सरकार जागरूक आहे. कृषी क्षेत्रात उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यात साखर उद्योगाचाही समावेश आहे. जागतिक अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे स्पष्ट करतानाच मोदींनी शेतकर्यांसाठी आरोग्य कार्ड, सोलर पंप व अन्य शेतकरी कल्याण योजना केंद्राने आखल्या असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असेही आवाहन त्यांनी केले.