अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांची स्पष्टोक्ती; पैशाच्या रुपांतरणावर लक्ष ठेवण्याचा इशारा
नवी दिल्ली: मोदी सरकारने काळ्या पैशांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. या कारवाईचा ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राला त्याचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयाने काही काळ गैरसोय होईल, मात्र देशाच्या निरोगी अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे; असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
मात्र, या निर्णयानंतर काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत बँकांकडून, विशेषत: सहकारी बँकांकडून भ्रष्टाचाराची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. थैलीशहांचे पैसे पांढरे करण्यासाठी भ्रष्ट अधिकारी नियमात फेरफार करण्याची शक्यता आहे. त्यावर नियामकांनी काटेकोर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे; असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे सरकारचा कर महसूल मोठ्या प्रमाणावर वाढेल. वस्तू व सेवा कारच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. ज्या राज्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे, त्यांना १०० टक्के भरपाई देणे सुलभ ठरेल; असे नरेंद्र जाधव यांनी नमूद केले.