मुंबई – आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या आयडिया आणि व्होडाफोन यांच्याकडून मुकेश अंबानी यांची मालकी असणा-या रिलायन्स जिओने इंटनकनेक्शन पोर्टची मागणी केली असून याचा वापर दोन नेटवर्कदरम्यान संवाद योग्यरित्या व्हावेत यासाठी करण्यात येत आहे. देशात यापूर्वीच सेवा देणा-या कंपन्यांकडून योग्य प्रकारे इंटरकनेक्शन पोर्ट देण्यात येत नसल्याने गुणवत्तेत समाधानकारक प्रगती होत नाही. पोर्ट देण्यासाठी या कंपन्या विलंब करत असल्याचा आरोप कंपनीने केला.
सेवा गुणवत्तेसंबंधीच्या मुद्यांचे समाधान करण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने कंपन्यांना ७ ऑक्टोबर रोजी निर्देश जारी केले होते. रिलायन्स जिओने या निर्देशांनुसार आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांना पत्र लिहित इंटरकनेक्शन पोर्ट जारी करण्यासाठी पत्र लिहिले आहे. दूरसंचार नियामक ट्रायने १७ ऑक्टोबर २०१६ ला मोबाईल कंपन्यांना पत्र लिहित ग्राहकांना चांगली सेवा मिळावी असे म्हटले होते.
गेल्या १५ दिवसांत काही प्रमाणात देशातील दिग्गज दूरसंचार कंपन्यांना कॉल ड्रॉपच्या समस्येपासून सुटका मिळाली आहे. जिओ आणि एअरटेल यांच्या दरम्यानमधील समस्या आता ५६ टक्क्यांवर आली आहे. २३ सप्टेंबर रोजी दोन्ही कंपन्यांतील कॉल ड्रॉप्सची आकडेवारी ७३ टक्के होती. तर सध्या व्होडाफोनच्या नेटवर्कवर अजूनही जिओचे ७५ टक्के कॉल फेल होत आहेत. हे प्रमाण यापूर्वी ८३.५ टक्के होते. देशातील तिस-या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आयडियाबरोबरच्या कॉल ड्रॉप्समध्ये ७५ टक्क्यांवरून ६२ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.