रिलयान्स जिओने लाँच झालेल्या पहिल्याच महिन्यात १.६ कोटी ग्राहक मिळवून या क्षेत्रात जागतिक रेकॉर्ड केले असल्याचा दावा कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केला आहे. ते म्हणाले दूरसंचार क्षेत्रातील कोणत्याही कंपनीला अगदी फेसबुक, व्हॉटसअप अथवा स्पाईकलाही ही कमाल करता आलेली नाही. रिलायन्स जिओने ५ सप्टेंबरला फोर जी सेवा सुरू केल्यानंतर २६ दिवसांतच १.६ कोटी ग्राहक मिळविले असून आक्टोबर अखेरपर्यंत ही संख्या ३.५ कोटींवर जाईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
रिलायन्स जिओतर्फे डिसेंबर अखेरपर्यंत वेलकम ऑफर्स सुरू आहेत.त्यातच कंपनीने आयफोन सेव्हन ग्राहकांना डिसेंबर २०१७ पर्यंत ही सेवा मोफत देऊ केलेली आहे. कंपनीचे १० कोटी ग्राहकांचे लक्ष्य असून सध्या देशातील ३१०० शहरांत या सेवेचा वापर सुरू झाला आहे. संपूर्ण देशभर हे जाळे लवकरच विस्तारले जाणार आहे. सध्या ग्राहकसंख्येत एअरटेल आघाडीवर असून त्यांची ग्राहकसंख्या आहे २५.७ कोटी. त्या पाठोपाठ व्होडाफोनची ग्राहकसंख्या २० कोटी, आयडियाची १७.७ कोटी आहे मात्र या कंपन्यांना ही ग्राहकसंख्या गाठण्यासाठी १५ वर्षे लागली आहेत.