उपवास, फलाहार किंवा लंघन हे आयुर्वेदाने आपली पचनसंस्था स्वच्छ व्हावी यासाठी सांगितलेले आहे. परंतु हिंदू लोक देवाच्या नावाने उपवास करतात आणि त्यामागचा आरोग्याचा दृष्टिकोन विसरून भलत्याच गोष्टी खात सुटतात. काही लोक अशारितीने अज्ञानापोटी उलट पचनास जड असे खाद्य पदार्थ खाऊन आपली प्रकृती बिघडून घेतात किंवा दुसरे टोक गाठून कडक उपवास करून प्रकृती बिघडवून घेतात. या दोन्हींचा सुवर्णमध्ये साधूनच उपवास करायला हवेत. काही लोक निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. ते आरोग्यासाठी घातक आहे. केवळ पाणी पीत राहिल्यामुळे त्यांचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तेव्हा केवळ पाणी पिण्याचा उपवास टाळला पाहिजे.
काही घनपदार्थ खायचेच नसतील तर फळांचे रस प्यावेत. तेही पातळ करून प्यावेत. फार घट्ट असू नयेत. फळांचे रस पीत असताना अधूनमधून लिंबू शरबत किंवा शहाळाचे पाणी प्यावे. ताकही प्यावे. काही लोक तळलेले अन्न खातात. साबुदाण्याच्या पापड्या, विशेषतः उपवासाच्या दिवसात तळून खाल्ल्या जातात. ते टाळले पाहिजे. कसलीही खीर खाऊ नये. चहा, कॉफी किंवा बाजारातून आणलेले तयार खाद्यपदार्थ अजिबात टाळावेत.
या उपवासाच्या दिवसात फळे खायला हरकत नाही. कारण फळांमध्ये जिवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. ऍमिनो ऍसिड, मूलद्रव्ये, एन्झाईन्स विपुलपणे उपलब्ध असतात. अशा फळांच्या सेवनाने वजनातली वाढ टळते आणि त्यांच्यातील द्रव्यांमुळे पचनसंस्थेचे प्रक्षाळण होते. फळे खाण्यापेक्षा त्यांचे ज्यूस काढून प्राशन करणे हितावह मानले जाते कारण फळांपेक्षा रस शरीरात लवकर मिसळतो.