भारत-पाकिस्तान सीमेवरील जम्मू भागातील उरी येथील पाकिस्तानचा हल्ला ही आपल्या देशाला झालेली मोठी जखम आहे. तिचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असे पंतप्रधान म्हणत असले तरी त्यांच्या कल्पनेतला बदला आणि लोकांच्या मनातला बदला यात मोठा फरक आहे. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत जनतेचे आकलन वेगळे असते आणि राज्य करणार्या राज्यकर्त्यांना जनतेच्या आकलनावर अवलंबून राजनीती करता येत नाही. अशा दोघांच्याही आकलनात फरक असला तरी जनतेच्या भावना विचारात घेतल्याविना दुसरा पर्याय नसतो. जनतेच्या आकलनानुसार राजनीती आखायची नाही परंतु जनतेच्या भावनांना मात्र प्रतिसाद द्यायचा या दोन गोष्टींच्या कोंडीमध्ये सरकार सापडलेले असते. उरीच्या बाबतीत असाच प्रकार सुरू आहे. पाकिस्तानचे मूठभर अतिरेकी घेऊन उरीतल्या भारतीय तळावर हल्ला करतात आणि त्यात आपले १८ जवान शहीद होतात. ही घटना नागरिकांना मोठीच धक्कादायक असते आणि या हल्ल्याचा बदला म्हणजे पाकिस्तानशी युध्द करणे आणि अर्थातच पाकिस्तानचे कंबरडे मोडणे हे लोकांना अपेक्षित असते.
उरीची जखम
भारताची क्षमता फार मोठी आहे आणि भारताचे लष्कर पाकिस्तानवर खरोखर चालूनच गेले तर भारताच्या या क्षमतेपुढे पाकिस्तान आठवडाभरसुध्दा तग धरणार नाही. हे सर्वांना माहीत आहे. अगदी पाकिस्तानलासुध्दा माहीत आहे. म्हणूनच पाकिस्तानी टी. व्ही. वर या संबंधात जेव्हा चर्चा होतात तेव्हा पाकिस्तानातलेच राजकीय विश्लेषक आपल्याच राज्यकर्त्यांना स्पष्टपणे असे बजावतात की भारताची खोडी काढू नका. भारत एक सुपरपॉवर आहे. म्हणजे भारताची पाकिस्तानपेक्षा मोठी असलेली युध्दसज्जता ही निर्विवाद आहे. विशेषतः भारताची क्षेपणास्त्रे ही जगाला स्तिमित करणारी ठरली आहेत. भारत जसा पाकिस्तानपेक्षा युध्द सज्जतेत भारी आहे तसा चीन भारतापेक्षा भारी आहे आणि तसे आता मानले जात आहे. परंतु अलीकडच्या काळात भारताने अशी काही साधने एकवटली आहेत आणि फ्रान्सशी लढाऊ विमानांसाठी मोठा करार केलेला आहे. त्यामुळे भारत युध्दसज्जतेच्या काही अंगांमध्ये चीनपेक्षा वरचढ ठरणार आहे. विशेषतः भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे शत्रूच्या उरात धडकी भरवणारे आहे. हे क्षेपणास्त्र रशियाच्या मदतीने आणि भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित करण्यात आले आहे आणि ते जगातले सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र ठरले आहे. या क्षेपणास्त्राने पाकिस्तान आणि चीनच नव्हे तर अमेरिकेच्यासुध्दा उरात धडकी भरली आहे. कारण अमेरिकेलाही एवढे वेगवान आणि लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करणे शक्य झालेले नाही.
एवढी युध्द सज्जता असतानाही आणि पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्यवान असतानाही उरीतल्या घटनेनंतर भारताला लोकांना अपेक्षित असलेल्या पध्दतीने म्हणजे युध्द पुकारून पाकिस्तानचा बदला घेता आलेला नाही. आपल्या संयमामुळे आणि आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे आपल्याला पाकिस्तानवर असा हल्ला करता येत नाही. ही आपली सामर्थ्य असूनही निर्माण झालेली हतबलता आहे. त्यामुळे जनतेच्या मनात एक आक्रोश निर्माण झालेला आहे. उरी येथे शहीद झालेल्या १८ जवानांचे पार्थिव देह त्यांच्या घरी आणण्यात आले. तेव्हा त्यांच्या कुटुंबामध्ये शोकाचा सागर उचंबळून आला. त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी पूर्ण शोककळा पसरली होती. या वातावरणात या जवानांच्या मुले-मुली आणि विशेषतः विधवा झालेल्या पत्नी आपल्या प्रिय व्यक्तीच्या हौतात्म्याबद्दल जसा शोक व्यक्त करत होत्या तशाच पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे अशी संतप्त भावनाही व्यक्त करत होत्या. त्यांच्या प्रमाणेच सामान्य जनतासुध्दा सरकारकडे आक्रोश करत आहे आणि पाकचा बदला घेण्याची मागणी करत आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान असा बदला घेतीलच असा विश्वासही लोकांना वाटत आहे. उरीच्या घटनेनंतर भारतीय जवानांनी आपल्या संयमाचे बंधन तोडून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला आणि १८ जवानांच्या बदल्या पाकिस्तानच्या २० जवानांचे बळी घेतले. भारतीय जनमानसाची बदला घेण्याची भावना या घटनेमुळे काहीशी शांत झाली आहे. परंतु सर्वसाधारणपणे लोक असे बोलतात की असा छोटा मोठा बदला घेण्यापेक्षा एकच आघात करावा आणि पाकिस्तान पुन्हा दहा वर्षे तोंड वर काढणार नाही. असे काही तरी करावे. पण ते करणे शक्य आहे का? आज तरी पाकिस्तान हे भारताच्या मानाने दुबळे राष्ट्र असले तरी त्याला अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन महाशक्तींचा पाठींबा आहे. लष्करी सिध्दतेच्या बाबतीत अमेरिका, चीन आणि भारत असे पहिले तीन क्रमांक लागतात. त्यातल्या पहिल्या दोन क्रमांकांच्या देशांच्या पाठिंब्यावर पाकिस्तान भारताच्या विरोधात वळवळ करत आहे. ही भारताची खरी अडचण आहे. तेव्हा पाकिस्तानला अमेरिका आणि चीन यांच्यापासून अलग करणे ही युध्दातली पहिली योग्य चाल ठरणार आहे आणि त्यादृष्टीनेच भारताचे प्रयत्न चालू आहेत. काही प्रमाणात अमेरिका पाकिस्तानला खडसावत आहे हे खरे परंतु पाकिस्तानचा पाठींबा ही अमेरिकेची आजची गरज आहे. ती एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेली आहे. तेव्हा ती परिस्थिती बदलण्याची वाट बघणे आणि अमेरिका-पाकिस्तान यांच्यात फूट पाडणे हेच पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आवश्यक ठरणार आहे.