अखंड बेसावध

congress
राजकारणात ज्याला काही करायचे असेल त्याने सतत सावध राहिले पाहिजे असा सल्ला समर्थ रामदास स्वामी यांनी दिला आहे. त्यालाच समर्थांनी अखंड सावधानता म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाला नुकताच अरुणाचलात धक्का बसला. या धक्क्यामागचे कारण काय आहे याचा शोध घेतला असता असे आढळून आले की, कॉंग्रेस पक्षात असलेली ‘अखंड असावधानता’ या धक्क्याला कारणीभूत ठरली आहे. पक्षात पक्षश्रेष्ठी नावाची यंत्रणा आहे आणि ती सतत बेसावध असते असे अरुणाचलातल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सत्तांतर होऊन सत्ता पुन्हा हाती आल्याला एक महिनाही झाला नाही तोच सार्‍या आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. अशा प्रकारची केवळ एका महिन्यात आणि सत्ता हाती असतानाही घाऊक सत्तांतर केले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी काही पत्रकारांनी अरुणाचलातल्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्या असता त्यांना कॉंग्रेस श्रेष्ठींच्या बेसावधपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळाले आणि या कॉंग्रेसच्या कार्यकर्ते आणि आमदारांनी पक्षाचा त्याग करायला महिना तरी का लावला असा प्रश्‍न त्यांना पडला.

गेल्या महिन्यातच कॉंग्रेसचे सरकार सत्ताभ्रष्ट झाले होते. पण पक्षांतरबंदी कायदा आणि पक्षांतर घडवताना भाजपाने केलेल्या काही चुका यांचा फयदा मिळून कॉंग्रेसच्या हाती पुन्हा एकदा सत्ता आली. दुसर्‍यांदा सत्ता हाती घेताना कॉंग्रेसच्या नेत्यांनी पेमा खांडू या बंडखोर नेत्यालाच मुख्यमंत्री केले आणि पक्षातली फूट टाळण्यात यश मिळवले. त्यानंतर खांडू यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना पक्षाची पुढची वाटचाल कशी असावी याबाबत काही निवेदन करण्याचे ठरवले. नवे मंत्री आणि मुख्यमंत्री त्यासाठी दिल्लीत आले. त्यांनी या दोन श्रेष्ठ नेत्यांची भेट व्हावी यासाठी काही मध्यस्थ गाठले आणि भेटीची इच्छा सोनिया आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचविली. पक्ष विकलांग होण्याच्या अवस्थेत असताना आणि फार मर्यादित क्षेत्रात पक्षाची सत्ता अबाधित असतानाच्या या प्रतिकूल काळात एक मुख्यमंत्री आपल्याला भेटायला येत आहेत असे कळले तर सोनिया गांधी यांनी त्याला ताबडतोब भेट द्यायला हवी पण त्यांनीही भेट दिली नाही आणि राहुल गांधीही त्यांना भेटले नाहीत. अरुणाचलातले बहुतेक कॉंग्रेस नेते आणि मुख्यमंत्री तीन दिवस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भेट व्हावी म्हणून आपले गाव सोडून दिल्लीत मुक्काम ठोकून होते आणि श्रेष्ठीच्या बोलावण्याची चातकासारखी वाट पहात होते. शेवटी ते निराश झाले.

आपल्या नेत्यांची भेट होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत पंतप्रधानांची भेट होतेय का हे पहावे म्हणून या नेत्यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काही तासातच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट मिळाली. मोदी यांनी पेमा खांडू यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकले आणि त्यांच्याशी अरुणाचलाच्या विकासाबाबत चर्चा केली. राज्याच्या विकासाच्या संबंधातले मोदी यांना माहीत असलेले तपशील ऐकून पेमा खांडू चकित झाले. दरम्यान अरुणाचलाचे कॉंग्रेस पक्षीय मुख्यमंत्री आपल्या आधी मोदी यांना भेटले आहेत हे कळल्यावर कॉंग्रेस श्रेष्ठी नावाची यंत्रणा जागी झाली. त्यावर मात्र काही तासांतच त्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी भेटीस बोलावले. भेटही झाली पण या भेटीत आस्थाही नव्हती आणि आपुलकीही नव्हती. राज्याच्या विकासाची तर चर्चाही नव्हती. सोनिया गांधी या शिष्टमंडळाशी अगदीच कोरडेपणाने बोलल्या आणि राहुल गांधींनी तर त्यांचे बोलणे सुरू असताना त्यांच्याकडे लक्षही दिले नाही.या दोघांनाही अरुणाचलाच्या समस्यांची जुजबी माहितीही नव्हती मग आस्था असण्याची तर गोष्टच निराळी.

अरुणाचलाच्या नेत्यांना यापूर्वी कॉंग्रेसशिवाय काही पर्यायच नव्हता त्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये होते. मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे वडील तर कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपली सारी हयात कॉंग्रेस पक्षात व्यतित केली. पण त्यांना कॉंग्रेस नेत्यांनी कधीही आदराची वागणूक दिली नाही. ते आदिवासी असून अज्ञानी आहेत याचा गैर फायदा घेत त्यांना मांडलिकासारखी वागणूक दिली. काही वेळा त्यांना कॉंग्रेस पक्षातली पदे मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पक्षातल्या दिल्लीच्या काही नेत्यांना पैसे द्यावे लागलेले आहेत. आताही कॉंग्रेसला वाईट दिवस आले असतानाही कॉंग्रेसच्या नेत्यांची ढेकी कायम आहे हे अरुणाचलाच्या नेत्यांच्या लक्षात आले आणि ते व्यथित मनाने राज्यात परतले. यापुढे कॉंग्रेसमध्ये राहण्यात काही अर्थ नाही असे त्यांचे मत झाले. त्यांनी सर्वांनी विचार करून एक वगळता सगळ्याच आमदारांनी एक मुखाने कॉंग्रेसची साथ सोडली आणि पीपल्स पार्टी ऑफ़ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला. त्यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरीही पूर्वोत्तर भारतात भाजपाने तयार केलेल्या विकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे नेते या घटनेवरून काही धडा शिकतील तरच कॉंग्रेसला काही भवितव्य आहे. याची जाणीव अजून तरी या पक्षात वाढीस लागलेली दिसत नाही. रोज उठून मोदीला एक शिवी दिली की आपल्याला आपोआप सत्ता मिळेल या भ्रमात ते अजूनही वावरत आहेत.