वर्षातील फक्त पाच तासासाठी उघडते निरई माता मंदिर

niraimata
भारतात देवीदेवतांच्या मंदिरांची संख्या लक्षावधींनी असेल. या प्रत्येक देवळामागे कांही ना कांही इतिहास, कहाणी, रहस्य असतेच. प्रत्येक मंदिराची कांही वैशिष्ठयेही असतात. छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यातील सोदुल नदीच्या काठी मोहेरा येथील निरई पहाडावरील निरई माता मंदिरही याला अपवाद नाही. याचे वैशिष्ठ म्हणजे हे मंदिर वर्षात एकदाच व तेही पाच तासांसाठीच खुले केले जाते. हे मंदिर म्हणायचे पण येथे मंदिरही नाही व मूर्तीही नाही. पहाडात ही एक जागा आहे. तरीही लाखो श्रद्धाळू येथे निरई मातेच्या दर्शनाला येत असतात. मात्र या मंदिरातही महिलांना प्रवेश नाही तसेच देवीचा प्रसादही महिला घेऊ शकत नाहीत. प्रसाद खाल्ला तर कांही तरी अघटीत घडते असे लोकांचे अनुभव आहेत.

या देवीला बळी देण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी मंदिर खुले होते तेव्हा अक्षरशः हजारो बकर्‍यांचे बळी येथे दिले जातात. हे बळी बोललेला नवस फेडण्यासाठी चढविले जातात असेही समजते. चैत्री नवरात्राच्या दिवशी हे मंदिर खोलले जाते व तेथे आपोआप ज्योत प्रज्वलीत होते व ती नऊ दिवस तेलाविनाच जळते असेही सांगितले जाते. या चमत्कारामुळे तर या देवीवर पंचक्रोशीतील भाविकांची अपार श्रद्धा आहे. ही ज्योत कशी प्रज्वलीत होते हे अद्यापीही न सुटलेले कोडे आहे. येथे लोक दर्शनासाठी येतात व नवस बोलतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे. या देवीची जत्रा चैत्रात भरते.

२००वर्षांपूर्वी जयराम गिरी गोस्वामी यांनी निरई मातेसाठी ६ एकर जमीन दान दिली होती. तेथे शेती केली जाते व त्यातूनच या मंदिराचा खर्च भागविला जातो. या देवीला कुंकु, गुलाल, शृंगार साहित्य असे कांहीही वाहिले जात नाही.

Leave a Comment