लाओस येथील आसियान बैठकीत आज पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यात भेट होणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. याच लाओसमध्ये ४० वर्षांपूर्वी व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेने टाकलेले कोट्यावधी बॉम्ब आजही मिळत आहेत व त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला कायमचा धोका निर्माण झाला आहे.
लाओस येथे आजही सापडताहेत बाँब आणि मिसाईल्स
असे सांगितले जाते की व्हिएतनाम युध्दाच्या वेळी अमेरिकेने लाओसच्या जमीनीचा बाँबचे डपिंग ग्राऊंड म्हणून उपयोग केला होता. या भूमीवर त्या काळात २७ कोटींपेक्षा जास्त बाँब, मिसाईल्स डंप केली गेली होती. त्यातील आठ कोटींहून अधिक अजूनही जमिनीत आहेत. आजही या शहरात दररोज स्फोट होत असतात व त्यात नागरिक घायाळही होतात. उत्तर व्हिएतनामची रसद तोडण्यासाठी अमेरिकेच्या सीआयएने बाँब डंप करण्याचा गुप्त कट राबविला होता. प्रत्यक्षात टार्गेट पर्यंत न पोहोचलेले बाँब येथे डंप करण्यात आले होते.
जमिनीतील या बाँब व मिसाईलमुळे लाओसमध्ये १९६४ ते ७३ या काळात २० हजारांहून अधिक नागरिक मारल गेले होते. आजही हा सिलसिला सुरूच आहे. त्यात मुलांची संख्या अधिक आहे कारण असे बाँब खेळताना मुलांना सापडले तर त्यांचा स्फोट होतो व मुले ठार होतात. या भागातील १ टक्का जमिन बाँबमुक्त करण्यासाठी १ कोटी डॉलर खर्च येत आहे. लाओसच्या शिअँग खाऊआंग भागात जंगल, शाळा, रस्ते , शेतात अगदी सहज बाँब आणि मिसाईल आजही सापडतात. अमेरिका हे टाकलेले बाँब निकामी करण्यासाठी ६ अब्ज रूपये खर्च करणार आहे असेही सांगितले जात आहे.