राजापूर – आज पहाटे कोकणातली प्रसिद्ध राजापूरची गंगा अवतरली असून राजापूरच्या गंगेचे सकाळी ६ वाजता आगमन झाले. राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली. यापूर्वी दर तीन वर्षांनी या गंगेचे आगमन व्हायचे, मात्र २०१२ साला पासून दरवर्षी गंगेचे आगमन होत आहे. राजापूरची ही गंगा शास्त्रज्ञांसाठी गूढ मानली जात आहे. राजापूरची ही गंगा अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
राजापूरात अवतरली गंगा
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचे रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचे गाव लागते. तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसेच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथे जातात. तिच्या अकस्मात येण्याजाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप आहे.