महिंद्रा ग्रुप भविष्यातील दळणवळण क्षेत्रातील पायोनिअरिंग रोल करण्याच्या तयारीत असून विनाचालक ट्रॅक्टर बनवून या क्षेत्रात क्रांती घडविण्याची तयारी सुरू असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आनंद महिद्रा यानी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना स्पष्ट केले. महिद्र जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे.
विनाचालक ट्रॅक्टरचे महिंद्राचे ध्येय
आनंद महिंद्र म्हणाले, भविष्यातील आव्हानांना पारंपारिक वाहन उत्पादक कसे तोंड देणार हा सध्या महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. कारण वातावरण व परिस्थिती बदलत आहे व त्यासाठी सहकार्य, अपारंपारिक उर्जेवरची वाहने व स्वदेशी हे तीन पर्याय आहेत. महिद्र स्वतंत्रपणे स्वदेशी वाहनांच्या संशोधनावर भर देत असून विनाचालक ट्रॅक्टर व अन्य व्यावसायिक वाहने याबाबत पायोनिअरिंगची भूमिका बजावण्यास सज्ज आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्यासाठी कृषी क्षेत्र हे फारच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी लागणारे ट्रॅक्टर हे महत्त्वाचे वाहन आहे. ट्रॅक्टरमुळे गंभीर अपघातांचा धोका नसतो तसेच शेतात काम करताना धडक बसणे असेही प्रकार कधीच घडत नाहीत. त्यामुळे विनाचालक व स्वयंचलित ट्रॅक्टर अन्न उत्पादनांचे भविष्य बदलू शकणार आहेत. आपल्या ट्रींगो व्यवसायामुळे ट्रॅक्टर उद्योगात क्रांती झाल्याचे सांगून ते म्हणाले की यात शेतकरी थोड्या काळासाठी ट्रॅक्टर भाडेपट्टीवर घेऊ शकतो. त्यामुळे लहानसहान शेतकरीही ट्रॅक्टरचा वापर करून शेती कामे वेगाने पार पाडू शकत आहेत.