देशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक

farmer
नवी दिल्ली: कृषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे. अशा कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड, आळ्या, बुरशी आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश येऊन कृषिउत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट होते आणि उत्पादनांची गुणवत्ता खालावते; असेही निदर्शनास आले आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या शेतीविषयक अभ्यासात ही बाब निदर्शनास आली आहे.

शेतकऱ्यांमधील अज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याबाबत कीटकनाशक उत्पादकांमध्ये असलेली उदासीनता यामुळे दर्जाहीन कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे कीटक आणि आळ्यांचा प्रतिबंध प्रभावीपणे होत नाही त्याचप्रमाणे नापिकी आणि पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते; असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव, भारतातील भाषा वैविध्य यामुळे आघाडीच्या रसायन उद्योगांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्य आणि त्याच्या वापराची पद्धत शेतकऱ्यांना समजावून देताना अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांचा वापर करतात. उत्पादक आणि शेतकरी यांच्यातील सुवा असलेल्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने ते देखील शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशक वापरण्याचा सल्ला देण्यात अपयशी ठरतात; असेही दिसून आले आहे.

Leave a Comment