नाशिक : आजवर नाशिकमधील द्राक्षे, कांदा आणि फळे-भाजीपाला प्रसिद्ध होता, पण आता येथील शेतकऱ्यांनी नवी झेप घेतली असून शेळ-मेंढी व्यवसायाला येथील धनगर समाज आणि इतर शेतकऱ्यांनी नवे रूप दिल्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांच्या शेळ्या–मेंढ्या विमानाने दुबईला जात आहे. नाशिककरांनी नव्याने सुरू केलेला हा प्रयोग प्रचंड यशस्वी होत आहे तसेच, त्याला लोकांचा पाठींबाही मिळतो आहे.
नाशिकच्या शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या विमानाने दुबईला
अरब राष्ट्रांत भारतीय शेळ्या-मेंढ्यांना चांगली मागणी आहे. भारतीय मेंढ्यांमध्ये गुणवत्ता असल्याने त्याला किंमतही चांगली मिळते. त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांनी मेंढ्यांचे स्कीनिंग करून विमानाने निर्यात करण्याचा प्रयोग राबवला आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार मेंढ्यांचे स्क्रीनिंग हे केले जाते. यंदाच्या वर्षी १२०० मेंढ्यांचे स्क्रीनिंग करून मेंढ्या दुबईला पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या पूर्वी समुद्रमार्गे जहाजाच्या सहाय्याने शेळ्या-मेंढ्यांची निर्यात होत असे. मात्र, आता हवाई मार्गाने प्राण्यांची निर्यात करण्याची सुविधा पूरवल्याने निर्यात जलद व सुखकर झाली आहे.
आजवर हवाईमार्गे प्राण्यांची निर्यात करण्यावर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे बंधने येत होती. मात्र, नाशिककरांनी पुढचे पाऊल टाकत न्यायालयीन लढाई लढली. त्यामुळे शेतीपूरक व्यावसायाला नवी चालना मिळत असून, त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहे. हा प्रयोग जसजसा यशस्वी होईल. तसे, अनेक शेतकरी नव्याने या व्यावसायात सहभागी होतील. त्याने शेतीवर अधारीत व्यावसायातून मिळणाऱ्या उत्पनात वाढ होईल, असा विश्वास अभ्यासक व्यक्त करतात.
दरम्यान, द्राक्षांसाठी नाशिकचे हवामान पोषक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आजवर द्राक्षे आणि कांदा यांसारख्या पिकांवर लक्ष केद्रीत केले. त्यातून या पिकांशी संबंधीतच व्यावसाय निर्मीती होत गेली. तसेच, या परिसरात निर्माण होणारी बाजारपेठही त्याला पूरकच निर्माण झाली. मात्र, नाशिक आता नव्याने कात टाकतेय. हेच शेळ्या-मेंढ्यांच्या या नव्या प्रयोगातून पूढे येत आहे.