पर्यटकांना सोलनपाडा डॅमवर नो एंट्री

solanpada-dam
रायगड – कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असले तरी या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार येथील स्थानिक शेतकरी करत असल्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

दर आठवड्याला किमान दहा हजार पर्यटक कर्जत तालुक्यातील सोलनपाडा या बंधारा वजा धबधब्यावर येतात. अतिशय मनमोहक अशा या ठिकाणी येणारे पर्यटक फार मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करून धींगाणा घालतात. अनेक अल्पवयीन शाळा कॉलेज मधील मुले, मूली आणि पर्यटक अतिशय तोकड्या कपड्यात सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून डॅमच्या पाण्यात किंवा आजु बाजूच्या झुडपात नको ते चाळे करीत असतात.

या विभागातील लहान मुले आणि मुलींवर पर्यटकांमुळे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून सदर पर्यटकांना हटकले तर ते ग्रामस्थानाच धमक्या देतात. मद्यधुंद पर्यटक आपल्या रिकाम्या दारुच्या बाटल्या आजुबाजूच्या शेतात फेकून देतात, दर आठवड्याला हजारो रिकाम्या बाटल्या या परिसरात फोडून फेकल्या जातात. त्यामुळे माळ रानावर गुराख्यांना म्हशी चारणे देखील अवघड झाले आहे, शेतांमधे सर्वत्र पसरलेल्या या बाटल्यांमुळे शेतात कामे करणारे शेतकरी जखमी होत आहेत, या समस्येमुळे टेंभरे ग्रामपंचायत आणि मोग्रज ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या हद्दीत येणाऱ्या पर्यटकाना बंदी घालावी असा ठराव करून त्याची प्रत बीडीओ आणि पोलिस निरीक्षक कर्जत यांना द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.

दरम्यान काल सोलानपाडा डॅमवर तिघांचा मृत्यू झाला. तर डॅम वर असणाऱ्या पायऱ्यांच्या कठाड्यावर डोक अपटून एकाचा मृत्यू तर दोघे धरणात बुडाले आहेत. या दोघांचे मृतदेह अजुनही मिळाले नाहीत. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. जोगेश्वरी येथील विनोद मथुराज रेड्डी, वय- 20 आणि गोरेगाव येथील अमित प्रकाश म्हात्रे वय-२४ असे त्या मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

Leave a Comment