रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी चारजण रिंगणात

rbi
मुंबई : रघुराम राजन यांच्यानंतर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे गव्हर्नर म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्र सरकारने गव्हर्नरपदासाठी चार जणांची नावे निवडल्याची माहिती आहे.

रघुराम राजन यांनी गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पदाची सूत्र सांभाळण्यासाठी नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरु झाला. आरबीआयचे विद्यमान उपगव्हर्नर उर्जित पटेल, आरबीआयचे माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबिर गोकर्ण आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदासाठी विचार होत असल्याचे म्हटले जात आहे. गव्हर्नरपदासाठी चौघांसोबतच विजय केळकर, अशोक लाहिरी आणि अशोक चावला या तिघांच्या नावांची चर्चा होती.

राजन यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपत आहे. रघुराम राजन यांच्या या निर्णयाला भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. रघुराम राजन यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण क्षेत्रात परतणार असल्याचे सांगितले. देशाला जेव्हा-जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा-तेव्हा मी मदतीसाठी तयार असेन, असेही राजन म्हणाले.

Leave a Comment