मुंबई : तुम्ही उन्हामुळे तापलेल्या शरीराला गारवा मिळण्यासाठी शीतपेयांना पसंती देत असाल तर जरा सावधानी बाळगा. तब्बल ९२ टक्क्यांपर्यंत ई कोलाय हा घातक जीवाणू मुंबईच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या थंड पेयांमध्ये आढळला आहे.
ई कोलायचे प्रमाण फेरीवाल्यांकडे असलेल्या पाण्यातही २६ टक्के एवढा आहे. सामान्यत: हा जीवाणू मानवी विष्ठेत आढळतो. ई कोलाय या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. हॉटेल्स, फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करुन हा निष्कर्ष मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने काढला आहे. ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आला, त्या सर्वांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई केली जात आहे.