विष्णू अवतार कल्कीचे भारतातील एकमेव मंदिर

kalki
हिंदू पुराणातून भगवान विष्णुचे दहा अवतार वर्णन केले गेले आहेत. त्यातील नऊ अवतार झाले असून दहावा कल्कीचा अवतार कलीयुग संपून सत युग सुरू होत असताना होणार असल्याची कल्पना आहे. हा अवतार अजून प्रत्यक्षात आलेला नाही मात्र कल्कीचे एकमेव मंदिर जयपूर मध्ये असून ते १७३९ मध्येच बांधले गेले आहे. हेरिटेज प्रॉपर्टी असेही त्याला म्हटता येईल कारण राजा सवाई जयसिंह दुसरे यांनी ज्यावेळी जयपूर वसविले तेव्हाच या मंदिराचे बांधकाम केल्याचे समजते.

जयपूरच्या हवामहल या जगप्रसिद्ध वास्तूजवळच हे मंदिर आहे मात्र ते फारसे कोणाला माहिती नाही. कल्की हा पांढर्‍या शुभ्र घोडयावर बसून व हाती तळपती तलवार घेऊन येईल असे वर्णन हिंदू पुराणात आहे. कलियुगाची अखेर होताना जगभर माजलेल्या अराजकातून पुन्हा शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यसाठी आणि दुर्जनांच्या निर्दाळणासाठी कल्कीचा अवतार होणार असा समज आहे. अर्थात या घटनेला अजून हजारो वर्ष अवकाश आहे. मात्र या भावी अवताराला मूर्ती स्वरूपात या मंदिरात साकारले गेले आहे.

हे मंदिर जुने झाले असले तरी त्याचे सौदर्य तिळमात्र कमी झालेले नाही. संगमरवर व लाल दगडात हे मंदिर उभारले गेले असून जुळी शिखरे परंपरेत ते बांधले गेले आहे. शेजारच्या एका मंदिरात कल्कीचे वाहन घोडा याची अतिशय सुंदर पांढर्‍या संगमरवरातील मूर्ती आहे. या घोड्याच्या पायावर जखमेची खूण आहे. ही खूण आपोआप नष्ट होईल तेव्हा कल्कीचा अवतार होईल असाही समज आहे. मंदिराच्या गर्भगृहात शंख, गदा अशी विष्णूची हत्यारेही कोरली गेली आहे. हे मंदिर फारसे परिचित नसल्याने येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते.

Leave a Comment