नवी दिल्ली : सप्टेंबरनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची त्याच पदावर फेरनियुक्ती व्हावी, असा सूर एका जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. एका अर्थविषयक वृत्तपत्राने ही चाचणी घेतल्यामुळे कायम टीका करणा-या सुब्रमण्यम स्वामींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
जनमताचा कौल राजन यांच्या बाजुने
मागील दिवसात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असून त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सप्टेंबरमध्ये राजन यांनी आपला कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा शिकागोला निघून जावे, असेही स्वामी यांना म्हटले होते.
राजन यांनी आखलेल्या धोरणांमुळे त्यांची पुनर्नियुक्ती करण्याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये बहुसंख्य नागरिक हे सकारात्मक असल्याचे दिसून आले आहेत. या सर्वेक्षणामध्ये ९ हजार १६८ जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 69 टक्के जणांनी राजन यांनी पुनर्नियुक्ती आवश्यक असल्याच्या बाजुने मत व्यक्त केले आहे. राजन यांनी देशाची अर्थव्यवस्था कठीण काळामध्ये योग्यपणे हाताळली, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.