नवी दिल्ली – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय एअरटेलने जाहीर केला असून कॉल ड्रॉपच्या संख्येत वाढ झाल्यास त्या प्रमाणात शिक्षणाच्या निधीतही वाढ करण्यात येईल, असे एअरटेलने सांगितले आहे. कंपनीने दरवर्षी १०० कोटी रुपये ग्रामीण भागात शिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.
एअरटेलने कॉल ड्रॉपसाठी १.५ टक्क्यांचे अधिक कडक मानक स्वच्छेने लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत कॉल ड्रॉप झाल्यास यातील काही रक्कम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कॉल ड्रॉपबाबत ग्राहकांना कोणतीही भरपाई न देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र ट्रायकडून सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणखी कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एअरटेलने कडक मानक लागू केले आहे.