देशात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कुठे होतात?

national
नवी दिल्ली : राज्यासह देशात सध्या नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे आंतरजातीय विवाहाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मात्र आजही आंतरजातीय विवाहांना स्वीकारले जात नाही, हे तेवढेच खरे आहे. परंतु भारतात असे एक राज्य आहे जे आंतरजातीय विवाहांमध्ये अव्वल आहे.
सर्वाधिक आंतरजातीय विवाह देशात मिझोराममध्ये होतात. ही बाब नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणात समोर आली आहे. ५५ टक्के लग्न मिझोराममध्ये आंतरजातीय होतात. एनसीएईआरच्या अहवालानुसार, भारतात ९५ टक्के विवाह एकाच जातीत होतात. पण मिझोराम याला अपवाद आहे. मिझोरामची ८७ टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्मिय आहे. आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत ४६ टक्क्यांसह मेघालय दुसऱ्या आणि ३८ टक्क्यांसह सिक्कीम तिसऱ्या स्थानावर आहे. इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार, आंतरजातीय विवाहाच्या बाबातीत जम्मू-काश्मीर चौथ्या आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे.

भारतातील ३३ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१,५५४ कुटुंबाचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला होता. भारतात एकाच जातीत सर्वाधिक लग्न मध्य प्रदेशात होतात, हेदेखील या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मध्य प्रदेशात ९९ टक्के लोक त्यांच्याच जातीत लग्न करतात. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ९८ टक्के विवाह एकाच जातीत होता. भारतात आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे. या संबंधित देशात कायदा ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून लागू आहे. परंतु जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना त्यांच्याच कुटुंबाचा किंवा समाजाचा विरोध तसेच हिंसेचा सामना करावा लागतो.

तरीही समाजात हळूहळू बदल होत आहे, ही बाब काहीशी दिलासा देणारी आहे. आमच्या समाजातील अशा लोकांना ओळखतो, ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे, असे सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या २७ टक्के लोकांनी मान्य केले आहे. शहरांमध्ये हा आकडा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचतो.

Leave a Comment