नवी दिल्ली- पदवीचे शिक्षण संपवून बिझनेस स्कूलमधून एमबीए करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची अनेक तरुण तरुणींची इच्छा असते परंतु त्यांच्या या विचारसरणीस तडा देणारा एक अहवाल समोर आला आहे.
एमबीएच्या केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या
काही प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालये आणि विद्यापीठांचा अपवाद वगळता इतर बिझनेस स्कूल सुमार दर्जाचे पदवीधर तयार करीत असून ते रोजगार मिळवण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे. बिझनेस स्कूलची संख्या बेसुमारपणे वाढल्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळणासा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांनी नोकरी मिळवली त्यांना १०,००० रुपयांपेक्षा कमी पगार मिळत आहे. असे आसोकामने म्हटले आहे.
बिझनेस स्कूलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उचलत आसोकाम एज्यकेशन कमिटीने मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केवळ सात टक्के व्यवस्थापन शास्त्रातील पदवीधरानांच नोकऱ्या मिळत आहेत. भारतात किमान ५,५०० बिझनेस स्कूल्स आहेत. त्यापैकी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, देहरादून या शहरातील २२० बी-स्कूल्स बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे तर शहरातील किमान १२० बी-स्कूल्स काही काळातच बंद होतील असे अहवालात म्हटले गेले आहे. २०१४-१६ या काळात कॅम्पस रिक्रूटमेंट म्हणजेच परिसर भरती ४५ टक्क्यांनी घटली आहे.