नवी दिल्ली : प्रत्येक वर्षाला लाखोंचा बळी कर्करोगाने जातो. याच्या विळख्यात आता लहान वयातील मुलांचाही समावेश होत आहे. भारतामध्ये प्रत्येक दिवसाला कॅन्सरमुळे ५० पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू होत आहे.
एका अभ्यासानुसार, एक महिना ते १४ वर्षांच्या वयातील मुले कॅन्सरची शिकार होत आहेत. सरकार या घातक आजाराशी लढत असल्याचे वारंवार सांगत असले तरी त्यांचा दावा या अभ्यासामुळे फोल ठरला आहे. कॅन्सरशी लढण्यासाठी देशामध्ये आवश्यक सुविधा नसल्यांमुळे त्याचा फटका रुग्णांना बसताना दिसत आहे. जागतिक ऑन्कॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधनिबंधामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये लहान मुलांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरशी लढण्यासाठी देशात आवश्यक सोयीसुविधा नाहीत. याला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत.
विकसित देशांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त कॅन्सर असणा-या रुग्णांना उपचाराच्या माध्यमातून जीवनदान दिले जाते. मात्र भारतामध्ये योग्य माहितीचा अभाव, लोकांचे कमी वय आणि सरकारची चुकीची धोरणे यामुळे लहान मुले आणि इतर तरुणांचा कॅन्सरशी लढताना नाहक बळी जातो, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. टोरँटो विश्वविद्यालय आणि मंबईमधील टाटा मेमोरियल सेंटर यांच्या अभ्यासानुसार, भारतामध्ये प्रति १० लाख लोकांपैकी ३७ लोकांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. कॅन्सरला गांर्भीयाने न घेतल्याने आणि त्याच्याशी लढण्याची तयार करण्यात आलेली धोरणे चुकीची असल्याने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर पीडितांना नाहक आपले प्राण गमवावे लागते, असे अभ्यासामध्ये म्हटले आहे.